आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण आरोग्यासाठी अनेक गोष्टी करतो, कधी डायट, कधी योगा, तर कधी महागडे जिम. पण एक गोष्ट आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ती म्हणजे चालणे. अगदी सहज करता येणारी, कुठेही आणि कधीही करता येणारी ही क्रिया खरंतर आपल्या आरोग्याचं पहिलं पाऊल ठरू शकते. काही लोकांना वाटतं की चालणं म्हणजे व्यायाम नाही, पण विज्ञान सांगतं की, दररोज ठराविक पावले चालल्यास ते ‘पूर्ण कसरत’ मानली जाऊ शकते.

दररोज 10 हजार पावले चाला-
आपण जर दररोज 10 हजार पावले चाललो, तर ते केवळ शरीराला नव्हे तर मनालाही आरोग्यदायी ठरतं. ही संकल्पना पहिल्यांदा जपानमध्ये प्रसारित झाली, पण आता ती जागतिक आरोग्यदृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. ही आकडेवारी ऐकायला मोठी वाटत असली, तरी ती साध्य करणे कठीण नाही. सकाळी थोडं फिरणं, दुपारी ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी जिना वापरणं आणि संध्याकाळी जवळच्या बागेत फिरणं या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे दहा हजार पावले सहज पूर्ण होतात. यामुळे केवळ वजन कमी होत नाही, तर रक्तदाब नियंत्रित राहतो, कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते आणि मनावरचा ताणही कमी होतो.
पण काही संशोधनातून असंही आढळून आलंय की, 10 हजार पावलांची सक्ती नसून, 7 हजार पावलेदेखील शरीरासाठी पुरेशी ठरू शकतात. विशेषतः जे प्रौढ आहेत किंवा ज्यांना सुरुवातीला अधिक चालणं शक्य नाही, त्यांच्यासाठी हे एक वास्तववादी लक्ष्य आहे. एवढं चालल्यानेही आयुष्याचा दर्जा सुधारतो, मृत्यूचा धोका कमी होतो आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
पावलं मोजायची कशी?
ही पावलं मोजायची कशी? तर हल्ली स्मार्टफोनमध्येच स्टेप काउंटर येतो. किंवा फिटनेस बँड वापरून आपण दररोज किती चाललो हे सहज मोजता येतं. यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं सोपं होतं आणि आपण त्या दिशेने सातत्य ठेवतो.
असेही बरेच लोक असतात, ज्यांचं काम सतत बसूनच असतं. अशा लोकांनी दर तासाला 5 मिनिटं चालण्याचा नियम पाळल्यास, त्यांच्या शरीरातील जडपणा कमी होतो. यातून एका वेगळ्या प्रकारचं स्वास्थ्य लाभतं. अगदी लिफ्टऐवजी जिना वापरणं किंवा संध्याकाळी गच्चीवर काही वेळ फिरणं हे साधे उपायदेखील परिणामकारक ठरतात.
चालण्याचे फायदे
चालणं फक्त शारीरिक लाभ देत नाही. मनःशांती, सकारात्मक विचार आणि नैराश्यापासून लांब राहण्यासाठीही चालणं उपयुक्त आहे. विशेषतः सकाळी स्वच्छ हवेत चालणं म्हणजे दिवसाची सुंदर सुरुवात असते. मन प्रसन्न राहतं, आणि दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा सहज मिळते.
जर कोणाचं उद्दिष्ट वजन कमी करणं असेल, तर मात्र चालताना गती थोडी वाढवावी लागते. कारण हळूहळू चालल्याने शरीर हलकं होतं खरं, पण जलद चालणं म्हणजे खरं कॅलरी बर्न करणं. त्यामुळे चालण्याचा वेग आणि वेळ योग्य प्रमाणात ठेवला, तर तेच चालणं आपल्या आरोग्यासाठी ‘जिमसारखी’ प्रभावी कसरत बनू शकतं.