Pune Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक आहेत आणि देशातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते.
शिवाय आपल्या देशातील रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात.

देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे आणि यामुळे रेल्वे कडून रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत तसेच रेल्वेचे जाळे आणखी वाढवण्यासाठी रेल्वे कडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे.
अशा परिस्थितीत आता आपण उपमुख्यमंत्री पवार यांनी घोषित केलेला हा रेल्वे मार्ग नेमका कसा असेल ? याचा कोणत्या भागातील नागरिकांना फायदा होणार ? याची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा रेल्वे मार्ग ?
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कोणापासून लपून राहिलेला नाही. शहराचा झपाट्याने होणारा विकास पाहता शहरात आगामी काळात वाहतूक कोंडीची समस्या आणखी भीषण बनणार आहे.
हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा दूर व्हावा या अनुषंगाने पुण्याभोवती रिंग रोड विकसित केला जात आहे.
रिंग रोड विकसित केल्याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
दरम्यान रिंग रोडची निविदा काढण्यात आली असून त्याला समांतर लोहमार्ग बांधणे सुद्धा आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.
तसेच हा नवा लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगावमार्गे उरुळी कांचन असा विकसित करणे रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या लोहमार्गाचा फायदा काय होणार?
पुणे जिल्ह्यात तयार होणारा हा नवा मार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत असेल आणि या नवीन रेल्वे मार्गामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाची बाब अशी की हा प्रस्तावित करण्यात आलेला मार्ग रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. या मार्गामुळे प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीलाही गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.
यामुळे रेल्वे जंक्शनवरील ताण कमी होऊन गाड्यांचे वेळापत्रक सुधारणार आहे. हा नवा प्रकल्प प्रवासी वाहतुकीसाठी तसेच चाकण आणि रांजणगाव येथील औद्योगिक विकासाला देखील चालना देणारा राहणार आहे.