Panjabrao Dakh : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. तापमानात सातत्याने घट होत असून थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवस राज्यातील थंडीची तीव्रता अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यातील तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पण जेष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबराव डख यांनी उद्यापासून राज्यातील हवामानात मोठा बिघाड होण्याची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असा अंदाज दिला असून आज आपण पंजाबरावांचा नवीन अंदाज सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे पंजाब डख यांचा अंदाज?
हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात थंडीची तीव्रता कायम राहील आणि काही ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळू शकते असे म्हटले आहे. पंजाब रावांनी सुद्धा राज्यात डिसेंबर अखेरीस थंडीचा जोर कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवेल. पण उद्यापासून पुढील दोन-तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि यामुळे त्या संबंधित भागांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी होऊ शकतो.
२१ ते २३ डिसेंबर या कालावधीत पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. ढगाळ हवामान राहणार असले तरी देखील पावसाची कोणतीच शक्यता सध्या दिसत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
डख यांच्या मते, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांत पाऊस होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या थंडीचा योग्य उपयोग करून आपल्या पिकांचे नियोजन करावे. ही थंडी किमान आणखी एक महिना टिकून राहण्याची चिन्हे असून, रब्बी पिकांसाठी हे वातावरण अनुकूल ठरणार आहे.
विशेषतः गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी थंडी पोषक असून, सिंचनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.दरम्यान, फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला हवामानात एक मोठा बिघाड होऊ शकतो आणि काही ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे.
या कालावधीत काही भागांत गारपिटीचा धोका तयार होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे. आगामी २०२६ वर्षाबाबत बोलताना पंजाब डख यांनी सांगितले की, पुढील वर्षी दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही.
मात्र, पावसाचे प्रमाण सरासरी इतकेच राहील. मागील काही वर्षांप्रमाणे अतिवृष्टी, ढगफुटी किंवा पूरस्थिती यंदा पाहायला मिळणार नाही, असा अंदाज आहे. पावसाळ्याची सुरुवात मे महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने होईल, तर जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून मुख्य पेरण्यांना वेग येईल.
पीक नियोजनाबाबत त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सरासरी पावसाच्या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन ही पिके पुढील हंगामात फायदेशीर ठरू शकतात, कारण ही पिके कमी पावसातही चांगले उत्पादन देतात.
तसेच पुढील वर्षी थंडीची सुरुवात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून होईल, जी नेहमीपेक्षा थोडी उशिरा असेल. दरम्यान हवामानातील हे बदल लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना या विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा, सांगली, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ढगाळ हवामानावर लक्ष ठेवावे आणि त्यानुसार आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र, पावसाची भीती बाळगू नये.