जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर, निवडणुका नवीन आरक्षण सोडतीनुसारच होणार

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नवी प्रभाग रचना जाहीर केली असून, त्यानंतर नव्याने आरक्षण सोडती होणार आहे. जिल्ह्यात ७५ गट, १५० गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून, गावपातळीवर मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर : अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी यंदा 75 गट आणि 150 पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. नवीन प्रभाग रचना तयार झाल्यानंतर नव्याने आरक्षण सोडत होऊन निवडणुका पार पडतील, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेला गती दिली आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. 

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत

त्यानुसार, 14 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करतील. यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत आहे. या हरकतींवर 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे सादर करायचे आहेत. 11 ऑगस्टपर्यंत हरकतींवर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, तर 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल. यानंतर प्रभाग रचना जाहीर होईल आणि त्यानुसार आरक्षण सोडत होईल. गेल्या तीन वर्षांपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या. मागील निवडणुकीत 73 गट आणि 146 गण होते. यंदा कर्जत आणि जामखेड तालुक्यांत प्रत्येकी एक गट वाढवून 75 गटांसाठी निवडणुका होतील.

राजकीय हालचालींना वेग

प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गावोगावी गट आणि गणांच्या आरक्षणावर चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नेते आता गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, गट आणि गणांचे तिकीट मिळवण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक गटात विजयाचे गणित जुळवण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

2011 च्या जनगणनेचा आधार घेण्याची शक्यता

नवीन प्रभाग रचनेनंतर 75 गट आणि 150 गणांसाठी आरक्षण सोडत होईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. नियमानुसार 2021 मध्ये जनगणना व्हायला हवी होती, पण ती झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. 2017 मधील निवडणुकीत 73 गटांपैकी 37 जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित होत्या.

2017 मधील जिल्हा परिषद गट

अकोले-  समशेरपूर, देवठाण, धामणगाव आवारी, राजूर, सातेवाडी, कोतूळ  

संगमनेर- समनापूर, वडगाव पान, आश्वी बु., जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बु., संगमनेर खु., बोटा, साकूर  

कोपरगाव- सुरेगाव, ब्राम्हणगाव, वारी, शिंगणापूर, चांदेकसारे  

राहाता- पुणतांबा, वाकडी, साकुरी, लोणी खु., कोल्हार बु.  

श्रीरामपूर- उंदिरगाव, टाकळीभान, दत्तनगर, बेलापूर बु.  

नेवासा- बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा बु., भानसहिवरे, खरवंडी, सोनई, चांदा  

शेवगाव- दहिगावने, बोधेगाव, लाडजळगाव, भातकुडगाव  

पाथर्डी- कासार पिंपळगाव, भालगाव, माळी बाभूळगाव, मिरी, टाकळी मानूर  

नगर- देहरे, जेऊर, नागरदेवळे, दरेवाडी, निंबळक, वाळकी  

राहुरी- टाकळीमिया, ब्राम्हणी, सात्रळ, बारागाव नांदूर, वांबोरी  

पारनेर- ढवळपुरी, कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर, निघोज, सुपा  

श्रीगोंदा- येळपणे, कोळगाव, मांडवगण, आढळगाव, बेलवंडी, काष्टी  

कर्जत- मिरजगाव, कोरगाव, कुळधरण, राशीन  

जामखेड- खर्डा, जवळा  

नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!