AI मुळे ‘या’ नोकऱ्या आल्या धोक्यात! भविष्यात आणखी किती रोजगार जाणार, कोणते क्षेत्र राहणार सुरक्षित? जाणून घ्या

Published on -

सध्या जगभरात एक मोठा प्रश्न डोकं वर काढतोय, एआयमुळे माझं काम तर जात नाही ना? हा प्रश्न केवळ आपल्या मनातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या विश्वात एक क्रांती घडवणाऱ्या माजी गुगल संशोधक आणि एआयचे गॉडफादर मानले जाणाऱ्या जेफ्री हिंटन यांच्या मनातसुद्धा आहे. अलीकडेच त्यांनी एका पॉडकास्टमध्ये एआयमुळे उद्भवणाऱ्या रोजगार संकटाबाबत चिंता व्यक्त करत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे.

कोणत्या नोकऱ्या धोक्यात?

हिंटन यांचं मत आहे की पुढच्या काही वर्षांत अनेक नोकऱ्या एआयच्या ताब्यात जातील. विशेषतः ज्या नोकऱ्या सतत एकसारखं काम करतात, त्या सर्वात आधी धोक्यात येतील. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे विशेषतः चिंतेचं कारण ठरू शकतं, कारण संवाद आधारित नोकऱ्यांमध्ये एआय सध्या मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे. हे बदल केवळ येत आहेत असं नाही, तर ते सुरुही झाले आहेत.

मात्र, काही क्षेत्रं अशी आहेत जिथे मशीन इतकं लवकर पोहोचू शकणार नाही. हिंटन यांनी प्लंबर होण्याचं उदाहरण दिलं – एक असं काम जे भौतिक श्रमावर आधारित आहे. मशीन एखादी गोष्ट “समजून” करू शकतं, पण दरवेळी भिंतीमागच्या पाईपचा अंदाज घेणं, त्याला दुरुस्त करणं हे अजून माणसालाच जमतं. म्हणूनच, अशा नोकऱ्या भविष्यातही सुरक्षित राहतील, असं ते म्हणतात.

इतिहास आपल्याला सांगतो की तंत्रज्ञान आलं की नोकऱ्या जात नाहीत, तर बदलतात. एटीएम मशीन आलं तरी बँक टेलर्स संपले नाहीत, त्यांनी दुसऱ्या स्वरूपात नवीन कामं स्वीकारली. हिंटन यांचा विश्वास आहे की असंच काहीसं या वेळीही होईल, पण फरक एवढाच की यावेळी तंत्रज्ञान खूप वेगानं बदलतंय आणि ते केवळ कामाचं स्वरूप नव्हे, तर त्याच्या गरजांनाही बदलतंय.

पदवीधरांबाबत चिंताजनक स्थिती

त्यांनी विद्यापीठ पदवीधरांबद्दलही चिंता व्यक्त केली. आज जे तरुण पदवी घेऊन बाहेर पडतात, त्यांना योग्य नोकऱ्या मिळणं कठीण जातंय. मोठ्या टेक कंपन्या जसं की मेटा, गुगल यांनी भरतीत लक्षणीय घट केली आहे. 2024 मध्ये केवळ 7% नवीन कर्मचाऱ्यांमध्ये पदवीधरांचा समावेश होता. यावरूनच समजतं की पारंपरिक शिक्षणाचं मूल्य एआयच्या तुलनेत कमी होत चाललंय.

हिंटन यांचा सल्ला

हिंटन यांचं उत्तर स्पष्ट आहे, आपली कौशल्यं विकसित करा. तुम्ही जर फक्त रिपीटीटिव्ह काम करत असाल, तर एआय तुम्हाला सहज बदली करू शकतो. पण जर तुमच्याकडे अशी कौशल्यं असतील जी सर्जनशील, तांत्रिक, किंवा सामाजिक संवादावर आधारित आहेत, तर तुम्ही भविष्यासाठी अधिक तयार आहात. एआयला साथ द्या, स्पर्धा करू नका. त्याच्यासोबत काम करणं शिका.

एआयमुळे रोजगाराचं जग खरंच बदलणार आहे. पण प्रत्येक बदलात संधीही असते. फक्त तिला ओळखायचं आणि तिच्यासाठी स्वतःला तयार ठेवायचं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!