जगाच्या अनेक भागांमध्ये विवाह केवळ एक परंपरा नसून सामाजिक स्थैर्याचं प्रतीक मानले जाते. विशेषतः मुस्लिम देशांमध्ये, जेथे कुटुंब आणि समाजरचना एकमेकांशी घट्ट जोडलेली असते, तिथे लग्नाचं वय लहान असणं हे फार सामान्य मानलं जातं. पण आता हे चित्र हळूहळू बदलताना दिसतंय. काही मुस्लिम देशांमध्ये महिलांच्या आयुष्यात एक वेगळीच क्रांती घडते आहे. इथे आता अनेक तरुण मुली विवाहाच्या बंधनात अडकण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याला स्वतंत्रपणे घडवण्याचा निर्णय घेत आहेत.
अरब देश
अरब देशांमध्ये सध्या जवळपास 25 दशलक्ष म्हणजेच 2.5 कोटी महिला 24 वर्षांच्या पुढच्या वयात असूनही अविवाहित आहेत. यातील बऱ्याचशा महिलांनी 35 वर्षांचं वय गाठलेलं असूनही त्यांनी लग्न केलेलं नाही. एकेकाळी जिथे वयाच्या विशिष्ट टप्प्यावर लग्न करणं अनिवार्य मानलं जायचं, तिथे आता हे बदलतंय. हे फक्त आकड्यांचं वास्तव नाही, तर सामाजिक मानसिकतेत होणारा खोलवर बदल आहे.

इजिप्त
इजिप्तसारख्या देशात या बदलाचं प्रमाण अधिक स्पष्टपणे दिसून येतं. 2010 मध्ये कुवैतच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राने केलेल्या संशोधनानुसार, इजिप्तमध्ये तब्बल 9 दशलक्ष मुली अशा आहेत ज्या अजूनही अविवाहित आहेत. ही संख्या केवळ इजिप्तपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण अरब प्रदेशातील एक तृतीयांश अविवाहित महिलांमध्ये इजिप्तचं योगदान सर्वाधिक आहे. म्हणजे, विवाहाचं पारंपरिक वय ओलांडूनही या महिला अजून ‘सिंगल’ आहेत.
अल्जेरिया
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो अल्जेरिया. इथेही अंदाजे 40 लाख मुली विवाहाच्या बंधनात नाहीत. या संख्येमागे केवळ समाजातील बदलती मानसिकता नाही, तर शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच ठरवण्याची तयारीही कारणीभूत आहे. आजच्या अल्जेरियन महिलांना केवळ ‘पत्नी’ बनण्यापेक्षा ‘स्वतंत्र व्यक्तिमत्व’ घडवणं अधिक महत्त्वाचं वाटू लागलं आहे.
इराक आणि येमेन
इराक आणि येमेनमध्ये तर या गोष्टींना आणखी एक पैलू आहे, राजकीय अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थिती. 2010 च्या माहितीनुसार, इराकमध्ये 30 लाख आणि येमेनमध्ये सुमारे 2 लाख महिलांनी विवाह केलेला नाही. सतत चालू असलेले संघर्ष, रोजगाराचा अभाव आणि सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे विवाह हे त्यांच्या आयुष्यातलं प्राधान्य नाही, हे स्पष्ट होतं.
सौदी अरेबिया
सौदी अरेबिया, ट्युनिशिया आणि सुदानसारख्या देशांमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळते. सुमारे 1.5 लाख महिलांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामाजिक दबाव, पारंपरिक अपेक्षा आणि नव्या पिढीच्या बदलत्या विचारसरणीतून या महिलांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे.