Bharat Bandh : 9 जुलैरोजी भारत बंद! देशातील तब्बल 25 कोटी कर्मचारी उद्या रस्त्यावर; पाहा शाळा, कॉलेज, बँका, पोस्ट सुरू राहणार की बंद?

Published on -

उद्या 9 जुलैला संपूर्ण भारतभर ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. कामगार हक्कांपासून ते सरकारच्या धोरणांवर होणाऱ्या नाराजीपर्यंतच्या अनेक कारणांनी हे आंदोलन पेटले आहे. अंदाजे 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, ज्यामुळे देशातील अनेक सेवा आणि सामान्य जनतेचा रोजचा व्यवहार पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतो.

या संपामागे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या काही धोरणांवर असलेला कामगार संघटनांचा राग. त्यांच्या मते, सरकार सार्वजनिक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे, ज्याचा थेट परिणाम लाखो कामगारांच्या रोजगारावर होतो आहे. या निर्णयांना केवळ कर्मचारी नव्हे, तर शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच हा बंद केवळ शहरी भागापुरता मर्यादित न राहता, ग्रामीण भारतातही त्याचा मोठा परिणाम जाणवू शकतो.

कधी असेल बंद?

हा संप बुधवार, 9 जुलै रोजी होणार आहे आणि यामध्ये बँका, टपाल सेवा, विमा कंपन्या, कोळसा खाणी, बांधकाम उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात काम करणारे लाखो कर्मचारी भाग घेणार आहेत. अशा स्थितीत अनेक महत्वाच्या सेवांवर परिणाम होणार आहे हे स्पष्ट आहे. खासकरून सरकारी आणि सहकारी बँकांमधील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोस्ट ऑफिसमधील सेवा उशीराने चालू होऊ शकतात किंवा थांबू शकतात, तर वाहतूक सेवांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळा आणि महाविद्यालये बंद?

शाळा आणि महाविद्यालये सुरू राहतील की बंद ठेवली जातील, याबाबत नागरिकांमध्ये सध्या संभ्रम आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने शाळा किंवा महाविद्यालये बंद ठेवण्याचे अधिकृत आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे शैक्षणिक संस्था सुरू राहतील असं गृहीत धरता येईल. मात्र, बस, ट्रेन आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांवर संपाचा परिणाम झाला, तर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

रेल्वे आणि पर्यटन

 

रेल्वे आणि पर्यटन क्षेत्रांना या संपातून वगळण्यात आले असले तरी, भारत बंदच्या दिवशी अनेक वेळा रेल्वे स्थानकांवर निदर्शने झाल्याची उदाहरणं आधी पाहिली आहेत. त्यामुळे अशा काही घटना घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज आहे. तरीही प्रवाशांनी पूर्वतयारी ठेवणं केव्हाही शहाणपणाचं ठरेल.

काय आहेत मागण्या?

या आंदोलनाची मागणी स्पष्ट आहे, सामान्य जनतेच्या हक्कांचं रक्षण करावं, खाजगीकरणाच्या धोरणांचा आढावा घ्यावा आणि कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावं. या मागण्यासाठीच उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!