आकाशात पसरत जाणाऱ्या नद्या… हे ऐकून क्षणभर तुम्हीही विचारात पडला असाल. नद्या तर जमिनीवर असतात, मग आकाशात कशा? पण हे काही कल्पनाविलास नाही, तर विज्ञानाने स्पष्ट केलेलं आणि पृथ्वीच्या भविष्यावर खोल परिणाम घडवणारं वास्तव आहे. अलीकडेच अंटार्क्टिकाविषयी झालेल्या एका संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की, या शतकाच्या अखेरीस वातावरणातील नद्यांची संख्या दुप्पट होऊ शकते. आणि हे केवळ आकडे नाहीत, तर जागतिक हवामान समजून घेण्यासाठी महत्त्वाचे संकेत आहेत.

आकाशातील नद्या म्हणजे?
आपण सर्वांनी जलचक्राविषयी ऐकलंय – समुद्रातून पाणी बाष्पीभवन होते, ढग तयार होतात आणि ते पाणी पुन्हा पृथ्वीवर पडतं. याच प्रक्रियेतून वातावरणात निर्माण होणाऱ्या मोठ्या वाफेच्या पट्ट्यांना ‘वातावरणीय नद्या’ असं म्हटलं जातं. या नद्यांमधून पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. विशेषतः उबदार महासागरांवर यांचा जन्म होतो आणि त्या थेट ध्रुवांकडे वाहू लागतात.
अंटार्क्टिकाबाबत धक्कादायक संशोधन-
ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेच्या मिशेल मॅकलेनन यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, 2100 पर्यंत अंटार्क्टिकामध्ये अशा नद्यांची संख्या दुप्पट होणार आहे आणि त्यांच्या वाहून आणलेल्या आर्द्रतेचे प्रमाण तब्बल अडीच पट वाढणार आहे. याचे एक साधं कारण म्हणजे हवामानातील उष्णता. उष्ण हवा अधिक वाफ साठवू शकते आणि त्यामुळे जास्त आर्द्रता तयार होते. परिणामी, आकाशात जेट स्ट्रीमच्या मार्गांवरून चालणाऱ्या या नद्या अधिक प्रचंड आणि शक्तिशाली बनतात.
मात्र या नद्यांचा परिणाम केवळ आकाशातच मर्यादित राहत नाही. अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित भूभागावर याचा थेट प्रभाव होतो. थंड हवामान असताना या नद्या बर्फवृष्टी घेऊन येतात – ज्यामुळे बर्फाचा साठा वाढतो आणि समुद्राची पातळी तात्पुरती कमी होते. पण उष्ण हवामानात हीच स्थिती घातक बनते. याच नद्यांमधून येणारा पाऊस किंवा गरम वारा बर्फ वितळवू शकतो, बर्फाची ताकद कमी करू शकतो आणि मग ते बर्फ थेट समुद्रात वाहून जाऊ शकतो.
अंटार्क्टिकावरील बर्फ वितळला तर…
याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे समुद्रपातळीतील वाढ. अंटार्क्टिका ही जगातील सर्वात मोठी बर्फ साठवणारी जमीन आहे – इतकी की, जर तिथला संपूर्ण बर्फ वितळला, तर पृथ्वीवरील समुद्रांची पातळी जवळपास 200 फूट म्हणजे 60 मीटरपर्यंत वाढू शकते. ही वाढ केवळ किनाऱ्यावरील शहरांनाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक हवामान व्यवस्थेलाही हादरवू शकते.