कुंडलीतील चंद्र दोष दूर करतात भारतातील ‘ही’ 6 चमत्कारी मंदिरं! जाणून घ्या अधिक

Published on -

मानसिक अस्थैर्य, अज्ञात भीती आणि सततच्या अस्वस्थतेने ग्रासलेले मन हे केवळ मानसिक थकवा नाही, तर तुमच्या कुंडलीतल्या चंद्राच्या अशुभ स्थितीचं संकेत असू शकतं. चंद्र ग्रह हा भावनांचा कारक मानला जातो. तो जर दुर्बल असेल, तर माणूस आतून कोसळू लागतो. चिंता, नैराश्य, अनिश्चितता याने भरलेलं आयुष्य जगू लागतो. पण भारतात आजही अशी काही देवस्थाने आहेत, जिथं फक्त दर्शन घेतल्यानेही चंद्रदोषाची तीव्रता कमी होऊ शकते. या मंदिरांमध्ये श्रद्धेने गेले, की मनाला खऱ्या अर्थाने शांती लाभते आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतो.

सोमनाथ मंदिर

या मंदिरांमध्ये पहिलं नाव घ्यावं लागतं ते गुजरातमधील पवित्र सोमनाथ मंदिराचं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले आणि अत्यंत प्रभावी स्थान मानलं जातं. इथंच चंद्रदेवांनी आपल्या शापमुक्तीसाठी महादेवाची तपश्चर्या केली होती. ‘सोम’ म्हणजेच चंद्र आणि ‘नाथ’ म्हणजे स्वामी म्हणून या स्थानाला मिळालेलं ‘सोमनाथ’ हे नाव केवळ नामस्मरणानेही मनाला शांती देतं. ज्यांच्या कुंडलीत चंद्र नीच राशीत आहे, त्यांनी इथं एकदा तरी दर्शन घ्यावं, असं वैदिक ज्योतिष सांगतं.

चंद्रेश्वर महादेव मंदिर

मग येतं ऋषिकेशच्या गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं चंद्रेश्वर महादेव मंदिर. असं म्हणतात की चंद्रदेवांनी इथं तब्बल 10,000 वर्षे तपश्चर्या केली होती. दक्ष प्रजापतीचा शाप दूर करण्यासाठी त्यांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अखेरीस शिवांनी त्यांना आपल्या जटांमध्ये स्थान दिलं. इथलं स्वयंभू शिवलिंग आणि त्यावरचा चांदीचा मुकुट, भक्तांच्या मनात अलौकिक विश्वास निर्माण करतो.

चंद्रमौलेश्वर आणि अनाथेश्वर मंदिर

दक्षिण भारतात उडुपीजवळ असलेली दोन प्राचीन मंदिरे चंद्रमौलेश्वर आणि अनाथेश्वर ही देखील चंद्रदोष निवारणासाठी ओळखली जातात. येथे चंद्र पुष्करिणी नावाच्या तलावाजवळ चंद्रदेवांनी महादेवाची आराधना केली आणि शापमुक्त झाले. उडुपीचं नावही चंद्राच्या या घटनेशी जोडलेलं आहे. ‘उडु’ म्हणजे तारा, आणि ‘पी’ म्हणजे नेता अर्थातच चंद्र-तारकांचा अधिपती.

कैलासंथार मंदिर

तामिळनाडूमधील थिंगलूर गावात असलेलं कैलासंथार मंदिर हे नवग्रहांपैकी चंद्र देवतेला समर्पित एकमेव प्रमुख मंदिर आहे. येथे शिव आणि त्यांची पत्नी देवी पेरियानाकी अम्मन यांचीही पूजा होते. पौराणिक कथांनुसार, चंद्रदेवांनी इथे ब्रह्माच्या शापातून मुक्तता मिळवली होती. त्यामुळे आजही भाविक इथे चंद्रदोष निवारणासाठी नतमस्तक होतात.

चंद्रोदय मंदिर

आणि अखेरीस, वृंदावनमधील चंद्रोदय मंदिर, कृष्णाच्या भूमीत उभं असलेलं हे मंदिर चंद्र ग्रहाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. इथं केवळ दर्शन नाही, तर शांततेच्या, ध्यानधारणेच्या माध्यमातूनही मनाची स्थिती बदलते, आणि भावनांचा प्रवाह संतुलित होतो.

चंद्र दोष म्हणजे केवळ ग्रहांची स्थिती नाही, ती आपल्या मानसिक स्वास्थ्याशी थेट जोडलेली असते. या मंदिरांना भेट देऊन भक्तीभावाने प्रार्थना केल्यास, चंद्राशी संबंधित अडचणी कमी होतात, मन अधिक स्थिर होतं आणि जीवनात आनंदाचे क्षण वाढतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!