भारतातील राजस्थान हे राज्य आपल्या राजेशाही थाट आणि संस्कृतीमुळे प्रचलित आहे. रेखीव किल्ले, भव्य राजवाडे, आणि येथील लोकसंस्कृती इतिहासाच्या जिवंत आठवणी बनून उभी राहते. येथे राजेपद भले आज कायदेशीर नाही, पण अजूनही काही घराणी आपल्या भूतकाळाच्या वैभवात नांदत आहेत.
या राजघराण्यांची गोष्ट सामान्य नाही. जयपूर, मेवाड, अलसीसर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि धोलपूर या सात घराण्यांचा इतिहास केवळ पुस्तकांतच नाही, तर त्यांच्या राहणीमानात, त्यांच्या शाही जीवनशैलीत अजूनही जिवंत आहे. या घराण्यांमधील लहान मुलं आजही सोन्याच्या खेळण्यांशी खेळतात, त्यांच्या पिढ्या अनेक सत्तांतरं पार करतही राजेशाही जीवन जगतात.

जयपूर घराणं
जयपूर हे शहर केवळ राजस्थानची राजधानी नाही, तर एक शाही परंपरेचा गाभा आहे. इथलं राजघराणं आजही राजेशाही थाटात राहणाऱ्या पद्मनाभ सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहे. वय फक्त 24, पण संपत्तीची किंमत तब्बल 20,000 कोटी रुपयांहून अधिक. त्यांच्या वास्तूंमध्ये आजही ऐश्वर्याचं दर्शन होतं, आणि त्यांच्या वैभवाची चर्चा देश-विदेशात होते.
मेवाड घराणं
उदयपूरच्या मेवाड घराण्याचं तर इतिहासात खास स्थान आहे. राणा प्रताप यांचं हे घराणं आज लक्ष्यराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यांनी मेवाडच्या वैभवाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. हेरिटेज हॉटेल्स, जगमंदिर पॅलेस, धार्मिक संस्थांमधून त्यांचं उत्पन्न येतं. इथं पर्यटन आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे.
अलसीसर घराणं
अलसीसर हे झुंझुनू जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, पण इथलं राजघराणं त्यांच्या कलेमुळे ओळखलं जातं. अभिमन्यू सिंह यांनी आपली वडिलोपार्जित जमीन एका शानदार रिसॉर्टमध्ये बदलली. राजेशाहीचा अनुभव देणारी ही वास्तू अनेकांना भुरळ घालते.
जोधपूर घराणं
जोधपूरचं राजघराणं म्हणजे श्रीमंती आणि अभिमानाचं प्रतीक. इथं लहान मुलं सोन्याच्या खेळण्यांनी खेळतात, आणि घराण्याची ताज ग्रुपसोबत हेरिटेज हॉटेल्समधली भागीदारी त्यांचं आर्थिक सामर्थ्य दाखवते. महाराजा हनवंत सिंह यांनी देशातील पहिली खासगी हवाई पट्टी इथंच बांधली, हे देखील एक वैशिष्ट्य.
बिकानेर आणि जैसलमेर घराणं
बिकानेर आणि जैसलमेर ही दोन घराणीही आपल्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखली जातात. बिकानेरच्या राज्यश्री कुमारी यांनी आपल्या हेरिटेज हॉटेल्सद्वारे शहराचा परंपरागत चेहरा जपला आहे. तर जैसलमेरचं घराणं ऑगस्ट 2025 मध्ये आपल्या अस्तित्वाला 870 वर्षं पूर्ण करणार आहे. चैतन्य राज सिंह हे आजच्या काळातही महारावल या पदावर आहेत.
धोलपूर घराणं
धोलपूरचं घराणं विशेष आहे कारण याच घराण्याशी वसुंधरा राजे यांचा संबंध आहे. एकेकाळी राजकारणात सक्रीय असलेलं हे घराणं आजही अब्जावधींचा वारसा सांभाळून आहे.
या सर्व राजघराण्यांनी आपला शाही थाट टिकवून ठेवला आहे, पण त्याच वेळी त्यांनी काळानुसार आपली दिशा बदलली. व्यवसाय, पर्यटन, आणि वारसा सांभाळणं हे सगळं त्यांनी एकत्र केलं आहे. राजेशाही संपली असली तरी, या घराण्यांचा रुबाब अजूनही त्या काळचं वैभव आठवून देतो.