एकेकाळी भारतात छापली होती चक्क ‘0’ रुपयाची नोट ? कारण ऐकून चकित व्हाल!

Published on -

भारतात चक्क’0′ रुपयांची नोट छापल्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? पण हे खरंय! मात्र, हे ऐकून मनात काही प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे, पैशाची किंमत नसणारी नोट का छापली असावी? तिचा उपयोग काय? पण या अनोख्या नोटेमागे एक सामाजिक जाणिवेची आणि जागरूकतेची प्रेरणादायक कहाणी आहे. एक अशी कहाणी, जी देशातील सामान्य माणसाला लाचखोरीविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ देणारी ठरली.

का छापली गेली 0 रुपयांची नोट ?

त्याच झालं असं 2007 मध्ये तामिळनाडूमधील ‘फिफ्थ पिलर’ या स्वयंसेवी संस्थेने एक आगळंवेगळं पाऊल उचललं. देशात वाढणाऱ्या लाचखोरीविरोधात शांत, पण प्रभावी लढा द्यायचा होता. सरकारी कार्यालयांपासून सामान्य नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांपर्यंत भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोलवर गेली होती. अशा वेळी लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि लाच देणे थांबवण्यासाठी, त्यांनी एक ‘0’ रुपयांची नोट तयार केली.

ही नोट खरी नव्हती, पण ती अत्यंत चर्चेत आले. महात्मा गांधींचा फोटो असलेली, 50 रुपयांच्या नोटेसारखी दिसणारी ही नकली चलन नोट भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याचं शस्त्र बनली. तिच्यावर स्पष्टपणे लिहिलं होतं “मी लाच देणार नाही, आणि लाच घेणाराही नाही.” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, तर एक ठाम भूमिकेचं प्रतीक होती.

फिफ्थ पिलरचे अनोखे आंदोलन

फिफ्थ पिलरने लाखो नोटा हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये छापून लोकांमध्ये वाटल्या. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं अशा सार्वजनिक जागांवर या नोटा वितरित झाल्या. या मोहिमेचा उद्देश होता, लाच देण्याऐवजी ही नोट समोरच्या अधिकाऱ्याला देऊन त्याला स्वतःच्या कृतीबद्दल विचार करायला भाग पाडणं.

लोकांनी हे इतकं मनावर घेतलं की अनेकांनी ही नोट स्वतः सोबत ठेवायला सुरुवात केली. लाच मागणाऱ्यांना ही नोट दाखवणं म्हणजे जणू त्यांच्या कृतीवर आरसा दाखवणं होतं. या एका नोटेने शेकडो अधिकाऱ्यांना लाजवून योग्य मार्गावर आणल्याच्या नोंदी आहेत. विशेषतः तरुणाईने या मोहिमेला उचलून धरलं. देशात तब्बल 1,200 शाळा-महाविद्यालयांत 30 लांब आणि 15 उंच ‘0’ रुपयांच्या नोटेचं बॅनर लावण्यात आलं. ही दृश्ये केवळ शिक्षणसंस्थांपुरतीच नव्हती, ती एका नवचैतन्याची नांदी होती.

मोहिमेला मिळालेलं यश

या मोहिमेचं सर्वात मोठं यश म्हणजे, लोकांच्या मनात भीतीच्या जागी जागरूकता आणि निर्धार निर्माण झाला. कुणीतरी लाच मागितली तर आधी घाबरून जाणारे नागरिक आता आत्मविश्वासानं ‘0’ रुपयांची नोट काढून दाखवू लागले. लोकांच्या हक्कांसाठी ही नोट एक स्मरणपत्र बनली.

या आंदोलनामागे असलेले विजय आनंद हे फिफ्थ पिलरचे सह-संस्थापक होते. त्यांचा विश्वास होता की, भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी तलवाराची नाही, तर समजुतीची गरज आहे. त्यांनी हे सिद्ध केलं की एखाद्या सामाजिक प्रयोगानेही मोठे परिणाम साधता येतात.

2014 नंतर ही मोहीम थांबली असली, तरी तिची आठवण अजूनही अनेकांच्या मनात ताजी आहे. ‘0’ रुपयांची नोट आजही एक स्मृती बनून आहे , की आपण एकजूट होऊन भ्रष्टाचारासारख्या मोठ्या समस्येचा सामना करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News