मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळाली असून, हा प्रकल्प २०२८ च्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-२०२५ च्या निमित्ताने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या रस्ते, रेल्वे, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यासह अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. या विकासाच्या इकोसिस्टममुळे महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रेसर राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
अडीच वर्ष काम थांबलेले
त्यांनी सांगितले की, मागील सरकारच्या काळात बुलेट ट्रेनचे काम अडीच वर्षे थांबले होते, ज्यामुळे गुजरातमध्ये या प्रकल्पाचे काम पुढे गेले, तर आपण मागे राहिलो. आता वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे.
मुंबईत सध्या अनेक मोठी विकासकामे सुरू आहेत. सागरी किनारा मार्ग, अटल सेतु आणि विविध मेट्रो मार्गांची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईत ५० बिलियन डॉलरपर्यंत गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नेहमीच भविष्यासाठी तयार असणारे राज्य आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

प्रकल्प गेमचेंजर ठरणार
वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प राज्यासाठी गेमचेंजर ठरणार आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरू पोर्टपेक्षा तिप्पट मोठे असेल. या बंदराला नाशिकपर्यंत महामार्गाने आणि पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्याची योजना आहे. तसेच, नवी मुंबईत नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. या परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याचाही सरकारचा मानस आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकसेवा ही केवळ कायदेशीर बाब नाही, तर ती एक उदात्त भावना आहे. लोकसेवा हक्क आयोगाने या भावनेला खऱ्या अर्थाने उजाळा दिला आहे. लोकशाहीचे मूळ या भावनेत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
मराठवाडा दुष्काळमुक्त होणार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पुरामुळे वाहून जाणारे पाणी तसेच पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी धरण आणि मराठवाड्याकडे वळवण्याची योजना आहे. यामुळे भविष्यात मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.