अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे.
व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

नगर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड याठिकाणी ना. थोरात यांच्या नगर दौऱ्या दरम्यान पार पडली. यावेळी ना. थोरात बोलत होते. निवेदन देत व्यापाऱ्यांना केंद्राच्या या अन्यायकारक कायद्यापासून वाचवावे अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी ना. थोरात यांच्याकडे केली आहे.
मंत्री ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारचा साठवणूकी संदर्भातला नवीन कायदा हा निश्चितच अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांचा याला असणारा विरोध हा रास्त आहे. या बाबतीत व्यापाऱ्यांच्या भावना या तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी या कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
व्यापाऱ्यांनी मांडलेल्या भावना सरकार समोर ठेवण्याचे काम मी निश्चितपणे करेल, अशी ग्वाही यावेळी थोरात यांनी व्यापाऱ्यांना दिली. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा म्हणाले की, कडधान्य साठवणुकीचा कायदा हा व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे.
आधीच कोरोनामुळे व्यापारी हा संकटात असून त्यामध्ये या नवीन कायद्यामुळे अधिक वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीची भूमिका सरकारने घ्यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम