शिर्डीच्या नूतन विश्वस्त मंडळाला पदभार स्वीकारण्यास खंडपीठाची मनाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या नूतन विश्वस्त मंडळाला अपूर्ण सदस्य संख्येमुळे पदभार स्वीकारण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली असून पुढील आदेश येईपर्यंत तदर्थ समिती कामकाज बघणार आहे.

दरम्यान श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या नवीन विश्वस्त मंडळाला न्यायालयाच्या पुढील आदेशाची पदभार स्वीकारण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अधिनियम 2004 व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट सदस्य समितीचे निवड अधिनियम 2013 नुसार राज्य सरकार संस्थान विश्वस्त यांची निवड करते.

मात्र निवड करतज्ञना या विश्वस्त मंडळात एक महिला व एक सामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील एक व्यक्ती तसेच विशेष ज्ञान असणार्‍या आठ व्यक्ती व सामान्य श्रेणीतील सात व्यक्ती अशा सतरा जणांची विश्वस्त म्हणून निवड करणे गरजेचे आहे.

मात्र सध्या राज्य सरकारने साईबाबा संस्थानचे नवीन नूतन विश्वस्त मंडळ नेमले त्यामध्ये सध्याची संख्या ही अपूर्ण आहे व अपूर्ण सदस्य संख्या असताना कामकाज करण्यास परवानगी देणे म्हणजे न्यायालयाचा कसूर ठरेल म्हणून या नूतन विश्वस्त मंडळाच्या पॅनलला पदभार स्वीकारण्यास पुढील आदेश येईपर्यंत औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे.

संस्थानचा कारभार 9 ऑक्टोबर 2019 पासून प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

सध्या तरी सदर समिती संस्थांनचा कारभार पाहत आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe