Maharashtra Monsoon LIVE : राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावलेला मान्सून आज महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग गोव्यासह वेंगुर्लापर्यंत आणि कर्नाटकच्या आणखी काही भागात आज पुढे सरकला असल्याचे आयएमडीतर्फे सांगण्यात आले.

गोव्याची हद्द ओलांडून मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मोसमी पावसाने कर्नाटकचा बहुतांशी भाग व्यापून गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर तो दक्षिण कोकणाची वेस ओलांडून वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती.
मान्सून दाखल झाला ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट बघत होते. अखेर मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती.
पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान 10 जून पासून कोकणसह मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची रिपरिप सुरू आहे. तर उद्यापासून म्हणजे 10 जूनपासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो.
यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.