आरक्षणाचा प्रश्न भिजवत ठेवून चालणार नाही पद्मश्री पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सोमवारी (दि. ३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. सर्व समाजातील धुरिणांना एकत्र बोलावून सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक त्वरित निर्णय घेण्याची गरज व्यक्त करत आपले प्रयत्न सुरूच आहेत परंतु फार काळ हे प्रश्न भिजवत ठेवून चालणार नाही.

सध्याची विविध समाजामधील तणावाची परिस्थिती आर्थिक गरजेपोटी उद्भवली आहे परंतु उशीर झाल्यास विविध समाजांमध्ये वैचारिक व भावनिक विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकीकडे ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे असे पद्मश्री पवार यांनी म्हटले आहे.

या पत्रात श्री. पवार यांनी पुढे म्हटले आहे की, गेली ५ वर्षे महाराष्ट्रात विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष चालू आहे. समाजात निर्माण झालेला असमतोलपणा हाच या गोष्टीला कारणीभूत आहे. सध्या जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

ही एक समाजात असमतोलपणाचीच बाजू असून त्यातून समाजात मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झालेली आहे. ज्यांना पूर्वीचे आरक्षण आहे त्यांना आपले आरक्षण कमी होईल कि काय याची भीती निर्माण होत आहे. ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळण्याची वाट पाहत आहेत हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.

एकीकडे शेतकरी दुष्काळाशी लढतोय तर दुसरीकडे शेतमालाला बाजाराभाव नाही म्हणून आत्महत्या करतो. कृषीनिविष्ठामध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी शासन कडक कायदे करण्याचे बिल आणत आहे. तर दुसरीकडे त्याविरोधात आंदोलन होतात.

दुग्धव्यवसायावर जिंवत असणारा शेतकरी दुधाला योग्य दर मिळत नाही म्हणून हतबल आहे. नव्याने नोकरभरती होत नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तर मुलांच्या शिक्षणासाठी शेतजमिनी विकाव्या लागत आहे.

कधीकधी मुलाच्या शिक्षणासाठी आईला सुध्दा स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केल्याची उदाहरणे सर्वांना माध्यमांमधून सर्वश्रुत आहेत. शेतकरी व शेतमजूर आर्थिक दृष्ट्या संकटात असून त्यातून हि परिस्थिती उद्भवली आहे असे मला वाटते.

तापमान बदलाचा सर्वात मोठा परिणाम शेतीवर होत आहे त्यातच शेतमालाची बाजारपेठ आता शेतमालाला न्याय देऊ शकत नाही. गावापासून दिल्लीपर्यंत निवडणुकामध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. तशातच जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस यांचा ग्रामीण जीवनावर मोठा परिणाम होत आहे. मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेची समस्या निर्माण होताना दिसत आहे. जातीजातीतील संघर्षामुळे संवाद नाहीसा होताना दिसत आहे.

त्याचा परिणाम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत यावर होत असून परिणामी ग्रामविकासाच्या योजनावर निधी असून आपसी मतभेदांमुळे कामे पूर्ण होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे भविष्यकाळात सामाजीक जीवनामध्ये याचा दूरगामी परिणाम होणार आहे. मतपेटी भोवती फिरणारी निर्णय प्रक्रिया वेळीच थांबली नाहीतर येणाऱ्या काळात याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

कुठेतरी समाज आणि राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि कोणालातरी याची किंमत मोजावी लागणार आहे हे निश्चित आहे. या राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून त्यांनी समाज संघटीत ठेवला आहे तो असाच संघटीत राहावा. या अपेक्षेसह वरील सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपूर्वक तातडीने विचार करावा असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते, असे श्री. पवार यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!