प्रवरेच्या मातीने समानतेचा दिलेला महत्त्वपूर्ण संदेश जीवनमूल्यांची शिकवण देऊन गेला असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज येथे काढले. लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उत्तर देताना जून्या आठवणींना उजाळा देत डॉ.करीर यांनी प्रवरा परिसरात झालेल्या जडणघडणीचा इतिहासही उलगडून दाखविला.
राज्याच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल लोणीचे भूमीपुत्र आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी या नात्याने लोणी ग्रामस्थांनी डॉ.नितीन करीर यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमत्री राधाकृष्ण विखे पाटील व ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते डॉ.करीर यांना मानपत्र, प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आणि पारंपरिक फेटा बांधून ग्रामस्थांनी सन्मानित केले. याप्रसंगी लोणी खुर्द येथील व्यापारी संकुलाचे उद्घाटन तसेच लोणी बुद्रूक येथे विकसित करण्यात येणाऱ्या ग्राम सचिवालयाचे भूमीपुजन सोहळा ही संपन्न झाला.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जेष्ठ नेते भाऊसाहेब विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कैलास तांबे, डॉ.भास्करराव खर्डे, नंदू राठी, शिवाजीराव जोंधळे यांच्यासह करीर कुटूंबीय आणि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.नितीन करीर यांनी प्रवरा पब्लिक स्कुल मधील तसेच लोणी येथील वास्तव्यातील आठवणींना उजाळा देताना येथील शाळेने आम्हाला संस्काराबरोबरच जगाच्या माहितीचे आकलन आम्हाला करुन दिले. आज ज्या बालवाडीत मी गेलो त्या जागेवर आत मोठी इमारत उभी आहे. पण त्या बालवाडीची जागा कायम ठेवल्याचा आनंद मला झाला.
महात्मा गांधी यांनी दिलेल्या संदेशाचा उल्लेख करुन, मनाच्या खिडक्या उघड्या ठेवा, जगात जे चांगले आहे ते स्विकारा आणि तुमच्यातील चांगले जगाला द्या, हा विचार ठेवून पुढे जाण्याचे आवाहन करतानाच काय चांगले आहे आणि काय वाईट आहे हे नेहमी विवेक शिकवत असतो.
संस्कृती आणि वेदाने सुध्दा विवेकच दिला. त्याची जोपासना करणे हे महत्वपूर्ण ठरणार आहे, असा सल्ला देतानाच प्रगती ही केवळ भौतीक नाही तर, मनाची आत्म्याची सुध्दा तितकीच महत्वाची असल्याचे मत श्री.करीर यांनी व्यक्त केले.
यापरिसरा विषयी असलेली आत्मियता आणि कृतज्ञता म्हणून आई-वडिलांच्या या स्मरणार्थ डिजीटल ग्रंथालय सुरु करणार असल्याची ग्वाही देवून या ग्रंथालयाचे काम एक दोन महिन्यात सुरु हाईल. असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याची व्यक्त केलेली इच्छा मी निश्चित पुर्ण करेल, अशी ग्वाही श्री.करीर यांनी दिली.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ.करीर यांच्या कार्याचा गौरव करुन, खडतर परिस्थितीचा कुठलाही अडसर येवू न देता त्यांनी उचित ध्येय साध्य केले. प्रशासनातील एक दांडगा अनुभव असणारा सनदी अधिकारी आज राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा गौरव झाला आहेच, पण यापेक्षाही पद्मश्री डॉ.विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते ते डॉक्टर करीर यांच्या रुपाने सत्यात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांनी डॉक्टर करीर यांचे व्यक्तिमत्त्व प्रवरेच्या भूमीतून घडले याचे एकमेव कारण पद्मश्री डॉ.विखे पाटील आणि खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी जगाचे ज्ञान देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. त्या संस्थेतून घडलेली व्यक्तिमत्त्व आज नावलौकीक साध्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी डॉ.करीर यांचा प्रशासनातील अनुभव हा खूप मोठा आहे. आजपर्यंतच्या वाटचालीत अतिशय पारदर्शीपणे राहिलेली त्यांची कार्यपध्दती ही प्रवरा परिसराला सुध्दा भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी केले, प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी मानपत्राचे वाचन केले.
युपीएससी मुलाखतीत पद्मश्रींचा उल्लेख बाबा
युपीएसीच्या तोंडी परिक्षेतील अनुभव सांगताना डॉ.करीर म्हणाले की, एका प्रश्नाच्या उत्तरात पद्मश्रींचा उल्लेख मी फक्त बाबा म्हणून केला. यावर मला समोरुन प्रतिप्रश्न येत राहीले परंतू मी माझ्या उत्तरावर ठाम होतो. कारण पद्मश्री हे या परिसराचेच म्हणजे या कुटूंबाचेच बाबा होते ही आत्मियता माझ्या मनामध्ये तेव्हाही होती आणि आताही आहे.