डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू होणार? कारखान्याच्या निवडणुकीत राजू शेटेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजूभाऊ शेटे यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कारखाना सुरू करून शेतकरी, कामगार व संस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Published on -

राहुरी- तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे, पण आता त्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. या कारखान्याच्या पुनरुज्जनासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या राजूभाऊ शेटे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केलाय.

शेटे यांनी मुंबईत शिंदे यांची भेट घेऊन कारखान्याच्या दुरवस्थेची माहिती दिली. “शेतकऱ्यांचा हा कारखाना पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी आणि माझी टीम राजू शेटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. या भेटीने राहुरीतील शेतकरी आणि कामगारांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कारखान्याची स्थिती

राजू शेटे यांनी शिंदे यांच्यासमोर कारखान्याच्या सध्याच्या दयनीय परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. कारखान्यावर वित्तीय संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज आहे, कामगारांचे पगार थकलेत, आणि कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी इतरत्र जावा लागतंय. यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक गळीत हंगामात आर्थिक नुकसान होतंय. कारखान्यासोबत जोडलेल्या शैक्षणिक संस्थाही अडचणीत आल्यात. “हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्याच मालकीचा आहे. तो पुन्हा सुरू झाला तरच शेतकरी आणि कामगारांचे हाल थांबतील,” असं शेटे यांनी शिंदे यांना सांगितलं.

सहकार्य करण्याचे आश्वासन

एकनाथ शिंदे यांनी शेटे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. “राहुरी तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजू शेटे यांच्या प्रयत्नांना मी पूर्ण पाठिंबा देईन. कारखाना पूर्वपदावर येण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन,” असं त्यांनी ठासून सांगितलं. शिंदे यांच्या या आश्वासनाने शेटे यांना बळ मिळालं असून, आगामी निवडणुकीत त्यांचा गट अधिक जोमाने लढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार

शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनीही यावेळी शेटे यांच्या कामाचं कौतुक केलं. “गेल्या कित्येक वर्षांपासून राजूभाऊ शेटे कारखाना पुन्हा सुरू व्हावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी झटत आहेत. त्यांचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत,” असं भोर यांनी शिंदे यांना सांगितलं. या भेटीवेळी शेटे यांचे सहाय्यक सतीश बोरुडेही उपस्थित होते.

राहुरी तालुक्यातील शेतकरी आणि कामगारांसाठी डॉ. तनपुरे कारखाना हा आधार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तो बंद असल्याने अनेकांचे हाल होतायत. आता शिंदे यांच्या पाठिंब्याने आणि शेटे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या निवडणुकीत नवी चेतना येण्याची शक्यता आहे. येत्या काळात कारखाना पुन्हा सुरू होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe