Maharashtra New Expressway : गेल्या का वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. काही भागात नवीन महामार्ग तयार करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी अस्तित्वातील महामार्गाची रुंदी वाढवली जात आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील अशाच एका महत्त्वाच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.
भंडारा ते बालाघाट दरम्यानचे 105 किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात या महामार्गाचे चौपदरीकरण होईल अशी आशा आहे.

कसा आहे प्रकल्प?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पाच वर्षांपूर्वी भंडारा-बालाघाट या 105 किमी अंतराच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले होते. पण, आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतरही या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात काही झालेली नाही.
त्यामुळे या मार्गाची अवस्था दयनीय झाली असून, या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय सोबतच अरुंद रस्त्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे प्राण सुद्धा गेले आहेत.
परिणामी हा महामार्ग ‘राष्ट्रीय महामार्ग’ की ‘मृत्यूचा महामार्ग’ अशीच चर्चा सुरू आहे आणि या रस्त्यांच्या कामावरून या भागातील नागरिकांकडून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
खरेतर, या राष्ट्रीय महामार्गाचे तीन टप्प्यात चौपदरीकरण होणार अशी माहिती समोर आली होती. भंडारा ते तुमसर, तुमसर ते वाराशिवनी आणि वाराशिवनी ते बालाघाट या तिन टप्प्यात या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार असा दावा करण्यात आला होता.
मात्र, प्रत्यक्षात जागा अधिग्रहण, विजेचे खांब, अरुंद पूल आणि दुर्लक्ष यामुळे कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही आणि हा प्रस्ताव अजूनही भिजतच पडलेला आहे.
समृद्धी महामार्गाला जोडला जाणार नवीन राष्ट्रीय महामार्ग
हा प्रस्तावित करण्यात आलेला भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. मोहाडी शहरातून हे दोन्ही महामार्ग जात असल्याने येथील व्यापार आणि पर्यटनास चालना मिळणार आहे. खरंतर हा महामार्ग भंडारा सहित संपूर्ण विदर्भातील विकासासाठी फायद्याचा ठरणार आहे.
हा मार्ग मध्यप्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याशी जोडला जाणार असून ग्रीन व्हॅली चांदपूर हे एक पर्यटनस्थळ सुद्धा विकसित होणार आहे. मात्र सध्या या मार्गावरील खड्डे, खिंडाऱ्या, अरुंद पूल आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे अनेक अपघात घडत असून, नागरिक भयभीत झालेले आहेत.
या महामार्गाचे चौपदरीकरण नेमके कधी होणार हा मोठा यक्षप्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत असून, या रस्त्याचे लवकरच काम सुरू होणार या आशेने नागरिकांनी नवीन घरांचे कामही थांबवले आहे.