रामायणातील अनेक पात्रं आपल्या धैर्य, भक्ती किंवा दुष्कर्मांमुळे प्रसिद्ध आहेत. पण काही पात्रं अशीही आहेत, ज्यांची कहाणी फारशी चर्चेत नसली तरी त्यांचं योगदान किंवा त्यांचा राग इतिहास घडवून गेला. त्यापैकीच एक म्हणजे रावणाची बहीण शूर्पणखा, जिला फक्त नाक कापण्याच्या प्रकरणातच नव्हे, तर रावणाच्या विनाशामागील कारणासाठीही ओळखले जाते.

कोण होती शूर्पणखा?
शूर्पणखा ऋषी विश्रवांची आणि आई केकसीची कन्या होती. तिचं मूळ नाव मीनाक्षी होतं, पण लांब नखांमुळे तिला शूर्पणखा म्हणजेच “मोठी नखं असलेली” म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ती स्वतः शक्तिशाली होती, पण तिचं आयुष्य दुःखांनी भरलेलं होतं. तिचं लग्न विद्युतजीव नावाच्या राक्षसाशी झालं होतं, जो पराक्रमी आणि बलाढ्य योद्धा होता. पण हे नातं रावणाला मान्य नव्हतं. त्याने आपल्या बहीणीच्या पतीला युद्धात ठार मारलं. ही घटना शूर्पणखेसाठी फक्त पती गमावण्याचीच नव्हे, तर आपल्या भावाकडून विश्वासघात होण्याचीही होती.
काही काळ लोटला आणि शूर्पणखा दंडकारण्यात राम आणि लक्ष्मणास भेटली. रामाच्या सौंदर्याने ती मोहित झाली, पण त्याने नम्रपणे तिला स्पष्ट केलं की तो सीतेप्रती निष्ठावान आहे. त्यानंतर लक्ष्मणाकडे वळलेली शूर्पणखा जेव्हा अपमानित झाली, तेव्हा तिने सीतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लक्ष्मणाने तिचं नाक कापलं. अपमान आणि वेदनेने भरलेली शूर्पणखा थेट आपल्या भावाकडे, रावणाकडे गेली.
शूर्पणखेने दिला होता शाप
पण तिच्या अंतःकरणात आधीपासूनच एक रागाची ठिणगी दडलेली होती, पतीच्या मृत्यूबद्दल. म्हणून काही पौराणिक कथा सांगतात की तिने रावणाला सीतेचं अपहरण करण्यासाठी चिथावणी दिली, कारण ती जाणून होती की सीतेच्या अपहरणामुळे रामाचा कोप ओढवेल, आणि अखेरीस रावण आणि त्याच्या साम्राज्याचा विनाश होईल.
यानंतर रावणाने सीतेचं अपहरण केल्यावर रामाने लंकेवर आक्रमण केलं, आणि शेवटी रावणाचा वध झाला. काही कथा अशा देखील आहेत जिथे सांगितलं जातं की, शूर्पणखेला जेव्हा कळलं की, तिच्या पतीची रावणाने हत्या केली तेव्हाच तिने मनातल्या मनात रावणाला शाप दिला होता “माझ्यामुळे तुझा आणि तुझ्या वंशाचा विनाश होईल.”