अहिल्यानगर जिल्ह्यातील ३२ हजार आजी-आजोबांनी शाळेत जाऊन दिली परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा

Published on -

अहिल्यानगर: इथल्या गावागावांतून निरक्षरांना साक्षर करायचं स्वप्न उल्लास नवसाक्षरता अभियानाने प्रत्यक्षात आणलंय. रविवारी (दि. २३) जिल्ह्यातील ३२ हजार ४९७ आजी-आजोबांनी शाळेत जाऊन परीक्षा दिली.

आता आठवडाभरात त्यांचा निकाल लागणार आहे, आणि मग प्रमाणपत्रंही मिळणार आहेत. गावातला हा उत्साह पाहण्यासारखा होता.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे अभियान जोरात सुरू आहे.

१५ वर्षांपुढच्या असाक्षर मंडळींना वाचता-लिहिता यावं, आकडेमोड करता यावी, आणि आयुष्यातली महत्त्वाची कौशल्यं शिकावीत, हा यामागचा उद्देश आहे.

यात आर्थिक साक्षरता, कायदा समजून घेणं, डिजिटल ज्ञान, आपत्ती हाताळणी, आरोग्याची काळजी, मुलांचं संगोपन, कुटुंबाचं हित, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

गावातल्या शिक्षित तरुणांनी किंवा विद्यार्थ्यांनीच आपल्या आजी-आजोबांना शिकवलं. आणि मग रविवारी गावच्या शाळेतच त्यांची परीक्षा झाली.

ही परीक्षा यशस्वी व्हावी म्हणून उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे, सहायक योजना अधिकारी श्रीराम थोरात, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका नोडल अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेतली.

या वर्षी (२०२४-२५) जिल्ह्याचं उद्दिष्ट होतं ३४ हजार ६२४ लोकांना परीक्षेला बसवणं. त्यातले ९३.६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झालंय, असं शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, अशोक कडूस, बाळासाहेब खुगे आणि डायटचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी ८ हजार प्रौढ साक्षर झाले होते, यंदा तर ही संख्या चौपटीनं वाढलीये.

विभागीय शिक्षण उपसंचालक हारूण आतार यांनी बोटा (जि. संगमनेर) इथल्या जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन आजी-आजोबांशी गप्पा मारल्या. त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं आणि उत्साह पाहून अभिनंदनही केलं.

जिथे नोंदणी झाली तिथेच परीक्षा झाली, म्हणजे बहुतांश गावातल्या जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळांमध्येच ही परीक्षा पार पडली.

परीक्षा होती १५० गुणांची – वाचन ५०, लेखन ५०, आणि संख्याज्ञान ५०. पास होण्यासाठी प्रत्येक भागात ३३ टक्के (१६.५ गुण) म्हणजे एकूण ४९.५ गुण मिळणं गरजेचं होतं.

आता दोन दिवसांत शिक्षक पेपर तपासून निकाल संचालक कार्यालयाकडे पाठवणार आहेत. मग जे उत्तीर्ण होतील त्यांना प्रमाणपत्रं मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!