अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला, तलाव आणि विहिरीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोेडले

Published on -

जामखेड- तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अकरा तलावांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. त्यामुळे शेतीसाठी तलावातून पाणी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे.

इतकंच नाही, तर तलावाशेजारील विहिरींची वीज कनेक्शनही तोडण्यात आली आहेत. या सगळ्यामुळे शेतकरी चांगलेच नाराज झालेत आणि प्रशासनावर त्यांचा राग वाढलाय.

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती आधीच नाजूक होती. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत याचा मुद्दा उपस्थित करून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याची दखल घेतली.

मंगळवारी (१८ मार्च) उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या. तालुक्यातील सर्व तलावांचं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायचं आणि शेतीसाठी पाणी द्यायचं नाही, असं ठरलं.

तलावांभोवतीच्या विहिरींची वीज कनेक्शन बंद करण्याचे आदेशही त्यांनी पाटबंधारे विभाग आणि महावितरणला दिले. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी झाली आणि वीज कनेक्शन तोडण्यात आलं.

पण प्रशासनाच्या या अचानक कारवाईने शेतकऱ्यांचा संताप वाढलाय. गेल्या वर्षी दोन-तीन तलाव वगळता बाकी सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले होते. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. खैरी मध्यम प्रकल्पात सध्या फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

या प्रकल्पामुळे परिसरात उसाचे पट्टे आहेत, पण आता पाणीच मिळणार नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. जामखेड शहराला पाणी देणाऱ्या भुतवडा तलावात ४३ टक्के पाणी आहे.

रत्नापूर तलावात १८.३५ टक्के, धोंडपारगावात २८.६५ टक्के, थोत्रीत १०.९४ टक्के आणि पिंपळगाव आळव्यात ६.४३ टक्के पाणी शिल्लक आहे. तर जवळके, तेलंगशी, मोहरी, नायगाव आणि अमृतलिंक ही पाच तलावं पूर्ण कोरडी पडली आहेत. या तलावांमध्ये आता मृतसाठाच उरलाय.

उन्हाची तीव्रता आणि भूगर्भातील पाण्याची घसरलेली पातळी पाहता प्रशासनाला हे पाऊल उचलावं लागलं. मुंगेवाडीत तर पाण्याची टंचाई इतकी तीव्र आहे की, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केली. दोन दिवसांत तिथे टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

त्याचबरोबर नायगाव, बांधखडक आणि मोहा या ग्रामपंचायतींसाठी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, पिण्याच्या पाण्यासाठी सगळं ठीक आहे, पण आमच्या शेतीचं काय? त्यांचा राग प्रशासनावर व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना आता पाण्याशिवाय शेती कशी करायची, हा मोठा प्रश्न पडलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News