Ahilyanaghar News: अहिल्यानगर- राज्यात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला व नेतृत्वाला मोठे यश असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही भाजप सर्वत्र विजयी होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्हाध्यक्षांनी व नव्या मंडलाध्यक्षांनी आपल्या भागाचा दौरा करून मतदारसंघ पिंजून काढावा. राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर राज्यात कधीही निवडणुका लागण्याची शक्यता असून, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे, असे सूचक वक्तव्य जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तयारीला लागण्याचे आदेश
अहिल्यानगर शहर व जिल्हा भाजपच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला.

अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रमसिंह पाचपुते, अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, मनोज कुलकर्णी, अंबादास पिसाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, शहराध्यक्ष प्रिया जानये, सचिन पोटरे व विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
आगामी निवडणुकाही भाजपच जिंकणार
पालकमंत्री विखे म्हणाले, विश्व नेता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळास अकरा वर्षे पूर्ण होणे ही भूषणवाह व गौरवास्पद गोष्ट आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याने महायुतीला जनादेश दिला आहे. भारतीय जनता पक्षाने योग्य रणनीतीने व लोकशाही मार्गाने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. त्याच रणनीतीवर आता महानगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही भारतीय जनता पक्ष जिकणार आहे. आता आमच्या निवडणुका संपल्या आहेत. येणाऱ्या काळात तुमच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वांनी तयारीला लागावे.
पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने काम करावे
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियाकडे व राजकारणाकडे दुर्लक्ष करावे. कोण कोठे गेले, ठाकरे बंधू, पवार काका पुतणे एकत्र येण्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नाहीये. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने काम करून सामन्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिला.
पक्षाचा सर्व्हे सुरू
आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी प्रयनशील आहे. या निवडणुकांसाठी पक्षाने सर्वे सुरू केला आहे. त्यामुळे या सर्वे मध्ये तुमचे नाव यावे यासाठी आपापल्या वॉर्डात, गटात व गणात मोर्चे बांधणी सुरू करा. सर्वेत जर तुमचे नाव आले तर तुमचा विजय दूर नाही.
बुथ रचनेच्या कामास तातडीने सुरूवात करा
अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले, येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व मंडलाध्यक्षांनी बूथ रचनेच्या कामास तातडीने सुरुवात करावी. या निवडणुका पूर्ण ताकतीने लागण्यासाठी बुध रचना आवश्यक आहे. पक्षाच्या सदस्या नोंदणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतल्याने जिल्ह्यात सदस्य नोंदणी उदिष्टाच्या पुढे गेली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले. बाबासाहेब वाकळे यांनी आभार मानले.