Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यातील माजी आमदारांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, या पक्षप्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे, या प्रवेशप्रक्रियेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीऐवजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत एका इतर कार्यक्रमातील पत्रकार परिषदेत पार पडले, यावरूनच पक्षांतर्गत महत्त्वाच्या समीकरणांचा अंदाज लावता येतो, असे पाचपुते म्हणाले.
कार्यकर्त्यांचा सन्मान
पाचपुते यांनी सांगितले की, आपल्याकडील कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान आणि स्थान मिळते. राजकीय निष्ठा आणि समाजसेवेच्या मूल्यांवर भाजप कार्यरत आहे. दुसऱ्या पक्षात वारंवार जाणाऱ्या नेत्यांची तुलना करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केवळ दोन वेळा पक्षप्रवेश केला, तर सध्याच्या नेत्यांचा प्रवास पाहिला, तर ते काही महिन्यांतच अनेक पक्ष पालटतात.

शेतकऱ्यांसाठी तत्काळ पावले
या पत्रकार परिषदेत केवळ राजकारणाचाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या अडचणीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाचपुते म्हणाले की, मे महिन्यात ३६९ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असून लवकरच नुकसानभरपाईसंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
भाजप अधिक बळकट
प्रवेश झालेल्या नेत्यांच्या निर्णयाचा आदर राखत, पाचपुते यांनी स्पष्ट केलं की, भाजप व पाचपुते कुटुंब यांच्यावर त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. उलट मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून आगामी निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील राजकारण तापणारच
पाचपुते यांच्या ठाम भूमिकेमुळे व पक्षबांधणीबाबत त्यांच्या आत्मविश्वासामुळे तालुक्यातील राजकीय लढत अधिकच चुरशीची होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. येत्या निवडणुकीत या संघर्षाचे परिणाम काय होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.