Pune Sambhajinagar Expressway : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा-जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या काही वर्षात राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत आणि या रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था फारच मजबूत झाली आहे.

ही दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून आणि पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या दोन्ही शहरादरम्यान पंचवीस हजार कोटी रुपयांचा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्ग प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला होता.
या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळकडून केले जाणार आहे. मात्र अजून या महामार्ग प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनासाठी आवश्यक निधीची तरतूद करून देण्यात आलेली नाही.
खरंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2500 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे पण राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता जवळपास दहा महिने उलटले आहेत पण अजूनही या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन हेतू निधीची तरतूद करून देण्यात आलेली नाही.
3 जिल्ह्यांमध्ये भूसंपादन करावे लागणार!
पुणे – छत्रपती संभाजी नगर या महामार्ग प्रकल्पासाठी तीन जिल्ह्यांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग विकसित करण्यात येणार आहे आणि यामुळे या तीनही जिल्ह्यात या महामार्ग प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन करावे लागेल.
या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर 39 महिन्यांपूर्वी या महामार्गाची घोषणा करण्यात आली. झाल्टा येथे या प्रकल्पासाठी माती परीक्षण करून महामंडळाकडून मुख्यालयाकडे आपला अहवाल सादर करण्यात आला.
दरम्यान गेल्या वर्षी हा महामार्ग प्रकल्प राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून पूर्ण करण्यात यावा यासाठी शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये महत्त्वाचा करार करण्यात आला. या करारानुसार तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या समन्वयाने प्रकल्पासाठी चे भूसंपादन पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले.
खरे तर या प्रकल्पासाठी ची भूसंपादनाची अधिसूचना म्हणजेच अधिसूचना 3 (ए) काढून आता 31 महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे पण अजूनही याच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद झालेली नाही.
यामुळे या प्रकल्पासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद होणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे सध्याच्या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सुद्धा प्रस्तावित आहे. पुणे – शिरूर – अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर या सध्याच्या महामार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.