बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनात वाढ करण्याचे मोठे आव्हान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बदलत्या हवामानात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हे सर्वात मोठे आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे.

अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान हा एक उपाय ठरू शकतो. त्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले.

राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्प व प्रयोगशाळांच्या भेटीत कैलास मोते बोलत होते.

मोते म्हणाले, सद्यस्थितीत शेतीवर मोठ्या प्रमाणात हवामान बदलाचा परिणाम हा शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नावर होताना दिसत आहे.भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी अल्प किमतीतील विविध संरक्षित तंत्रज्ञानाचा विकास झालेला आसुन यामध्ये शेडनेट हे एक तंत्रज्ञान आहे.

भाजीपाला आणि मसाला पिकांची लागवड कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या शेडनेट तंत्रज्ञानाच्या अवलंबनाविषयी शेतक-यांना जागृकता करावी असे मोते यांनी म्हटले.

यावेळी विद्यापिठातील अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्प प्रशासनाच्या वतीने प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या विविध डिजीटल तंत्रज्ञान, ड्रोन व रोबोटिक प्रयोगशाळा, स्वयंचलीत पंप प्रणाली हायपर स्पेक्ट्रलर प्रयोगशाळेविषयी माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe