अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे धरणे, तलाव हे तुडुंब भरून निघाले होते. आता उन्हाळा सुरु होऊ लागल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे.
यातच रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण करण्यासाठी दारणातुन 1100 क्युसेकने तर मुकणेतून 600 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे.

तर शुक्रवारी सकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरी चा उजवा कालवा 200 क्युसेकने तर गोदावरीचा डावा कालवा 100 क्युसेकने सोडण्यात आला आहे.
या दोन्ही कालव्यांना पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे तर वैजापूर, गंगापूरच्या दिशेने वाहणार्या जलद कालव्याला आज शनिवारीच नांदूरमधमेश्वर बंधार्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
गोदावरी च्या उजव्या कालव्यावर सात क्रमांकाच्या अर्जानुसार 1410 हेक्टरची मागणी आहे. संपूर्ण फेब्रुवारी महिना हे आवर्तन सुरू राहील. तीन दिवसांनंतर हे पाणी राहाता परिसरात दाखल होईल.
पहिल्यांदा पिण्याच्या पाण्यासाठीचे साठवण तलाव भरले जाणार आहेत. उन्हाळ्यातील आवर्तनासाठी पाणी राहणे महत्वाचे आहे.
पाण्याचा अपव्यय न होता, शेतकर्यांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जलसंपदाचे राहाता विभागाचे उपअभियंता महेश गायकवाड यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम