Nagar Urban Bank: अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सर्वात महत्वपूर्ण बँकापैकी एक असणारी बँक म्हणजे नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank)होय. या बँकेत मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक कोट्यवधींचा गैरव्यवहार झाले आहे तसेच या बँकेची सुमारे ४६० कोटींची थकबाकी आहे.
मात्र बँकेचा संचालक मंडळ या थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रत्यन करत नाही उलट कर्जदारांना पाठिशी घालण्याचे काम संचालक करीत असल्याचा आरोप बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केला आहे. याच बरोबर कर्ज वितरणात मोठा घोटाळा करणाऱ्यांवर पोलिस यंत्रणा, आर्थिक गुन्हे शाखा, केंद्रीय निबंधक कार्यालय कारवाई करत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात चोपडा यांनी म्हटले आहे, की सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी तब्बल ४७ वर्षे अतिशय शिस्तबध्दरित्या बँक चालवून तळहाताच्या फोडाप्रमाणे ही आर्थिक संस्था जपली. मात्र ही घडी विस्कटण्याचे काम सध्या करण्यात येत आहे.
त्यामुळे मनाला प्रचंड वेदना होतात. बँकेचा जागरूक सभासद या नात्याने बँकेच्या हितासाठी व चांगल्या भवितव्यासाठी मी वेळोवेळी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. प्रत्यक्ष बँकेत जावूनही चर्चा केली आहे. आज रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लावून सात महिने लोटले आहेत. या काळात थकीत कर्ज वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.
मल्टीस्टेट ॲक्टनुसार भासदाला संचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त मिळणे बंधनकारक आहे. मी अनेकदा पत्र व्यवहार करूनही या कायद्याचे पालन करण्यात येत नाही. एकही माहिती दिली जात नाही. गैरव्यवहार करणारांना कायदेशीर मार्गाने शिक्षाही मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका असल्याचे चोपडा यांनी मांडली आहे.