मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना विनवणी केली आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर सेना-भाजप एकत्र येतील. काही कारणास्तव दुरावलेल्या पक्षांनी एकत्र आले तर या राजकीय ताणाचा सुवर्णमध्य साधता येईल, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे.