sale of village : सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. भाजीपाला सध्या खूपच स्वस्त झाला आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कितीही चांगली शेती करा, राबा, चांगलं पिक आना पण जर त्या मालालाच भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यानं करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच सरकार दरबारी किती हाका मारायच्या? पण ऐकतो तरी कोण? यामुळे नाराज झालेल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले आहे. हे खोट वाटत असले तरी हे खरे आहे. यामुळे अधिकारीही कोड्यात पडले आहेत.
याबाबत माहिती अशी की, नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावच गावकऱ्यांनी विकायला काढलं आहे. याचा गावकऱ्यांनी ठराव करून तो शासनाकडे पाठवणार आहेत. यामुळे याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगू लागली आहे.
तसेच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. याच्याआधी गावचा विकास होत नसल्याने राज्यातील अनेक गावांनी कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्यास परवानगी द्या असे ठराव केले होते. त्याची देखील बरीच चर्चा झाली होती.
त्यानंतर आता फुलेमाळवाडी विकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याने फुलेमाळवाडी गाव चर्चेत आले आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना आता तरी न्याय मिळणार का याकडे शेतकरी आशेने बघत आहेत.