‘आमचे काय?’ असे हे आमदार आता आपापल्या नेत्यांना विचारू लागल्याने या सर्वांची नाराजी दूर करण्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी (९ किंवा १० जुलै) मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत माहिती दिली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली तरी त्यांचे खातेवाटप यामुळे आठवडाभर रखडणार असल्याचे समजते. राज्याच्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांच्या ८ समर्थक आमदारांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-1111.jpg)
आता त्यांना कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे. मात्र या मंत्र्यांना आणखी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा गट सत्तेत आल्याने भाजप व शिंदे गटातील आमदारांत अस्वस्थता आहे. आमचा विस्तार होणार होता, पण राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेतले, असा नाराजीचा सूर दोन्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांतून उमटू लागला आहे.
विशेषतः शिंदे गटातील आमदारांत मोठी चलबिचल सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटातून एक-दोन कॅबिनेट मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. शिवाय भाजप आणि शिंदे गटातील ४-४ आमदारांना राज्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीतील दोन आमदारांना राज्यमंत्रीपदे मिळू शकतात, असे सांगितले जाते.
नवे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सोमवारी दुपारी भेट घेतली. यावेळी खातेवाटपासोबतच राष्ट्रवादीतील फुटीसंदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मात्र आपल्या सरकारला राष्ट्रवादीतील किती आमदारांचे समर्थन मिळते ते पाहूया मग पुढील पावले टाकूया, असा सल्ला फडणवीस यांनी दिल्याचे कळते. येत्या बुधवारी ५ जुलै रोजी शरद पवारांनी तसेच अजित पवारांनी आपापल्या गटाची बैठक बोलावली आहे. त्यावेळी कोणाकडे किती आमदार हे स्पष्ट होईल.
त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे कळते. येत्या १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यासाठी आठवडाभर आधी म्हणजे या आठवडाअखेर ९ ते १० आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
त्याचवेळी सर्वांचे एकाच वेळी नव्याने खातेवाटप होणार आहे. पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाताना सर्व नव्या मंत्र्यांना आपापल्या खात्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आठवडाभर वेळ मिळेल, अशी रणनीती आखली जात आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व ९ मंत्री आठवडाभर बिनखात्याचे मंत्री असतील. दुसरीकडे मंगळवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नवनिर्वाचित मंत्री हजर राहणार असून, मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करणार आहेत.