Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारशी बोलणे आणि सांगणे जरा अवघड आहे. पण यातून आज ना उद्या मार्ग निघेल. एकदा मार्ग निघाला की राज्य सरकारला मदत करणे भागच पडेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. त्यामुळे आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या काही तास आधी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊन राजकीय संदेश दिल्याचे मानले जात आहे.
![Maharashtra Politics](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-शरद-पवार.jpg)
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाकडून गडकिल्ल्यांशी संबंधित ‘दुर्गवैभव’ या सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज – उद्धव ठाकरे
गडकिल्ले, दुर्ग हे आपले वैभव आहे. हे ‘दुर्गवैभव’ वाचवण्याची गरज आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना भूगोल आहे, असे म्हणतात. याच इतिहासातून आपण प्रेरणा घेण्याची गरज आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्या काळी आग्रा होते. आता दिल्ली आहे. दिल्लीला पाणी कसे पाजायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या इतिहासातून दाखवून दिले आहे. त्यातूनच आजच्या काळात प्रेरणा घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात ज्याचा जन्म होतो, त्याच्या रक्तातच शिवप्रेम भिनलेले आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेतली नाही तर काय उपयोग ? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने लढण्याचे आवाहन मराठी जनांना केले.