Maharashtra News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विटल २४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपली माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसमोर जेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हा केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात पुढे करते. कांद्याच्या बाबतील मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या परीस्थितीची दखल घेऊन केंद्र सरकारने पहिल्यांदाच याबाबतीत घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील सर्व नेत्यांसमोर परीस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यामुळेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय पहिल्यांदा झाला आहे.
यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात कांद्याच्या दराचे प्रश्न वेळोवेळी निर्माण झाले होते; परंतु शेतकरी हिताचे निर्णय करण्याचे धाडस त्यावेळच्या केंद्रातील मंत्र्यांनी कधी दाखवले नव्हते. आज तेच नेते केंद्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यापेक्षा या प्रश्नाचे राजकीय भांडवल करीत असल्याचे आश्चर्य वाटत असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून यापूर्वी सर्व नियम व अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.