Maharashtra News : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा सरकारपुरस्कृत भ्याड हल्ला आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. थोरात म्हणाले, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बाळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-09-02T123111.766.jpg)
चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. या बाबी मराठा आंदोलकांसह आम्हीदेखील वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत.
केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाशक्तीचे सरकार असताना मार्ग निघत नसेल तर मराठा समाज अस्वस्थ होणारच आहे, सरकारने आंदोलकांची मनोभूमिका समजून न घेता आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे, असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.