राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी ! शासन आपल्या दारी असे म्हणत कोट्यावधी रुपयांचा खर्च…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना कोट्यावधी रुपये दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा व दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा सरकार स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता हे पैसे खर्च करत असतील तर एक प्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी (दि. १८) पार पडल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, सुनीता भांगरे, शहराध्यक्ष अभिषेक कळमकर आदि उपस्थित होते.

आमदार तनपुरे म्हणाले की, शासन आपल्या दारी असे म्हणत कोट्यावधी रुपयांचा खर्च केला. वास्तविक पाहता लोकांच्या घरामध्ये जाऊन यांनी दाखले देणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

आज अनेक योजना प्रलंबित आहेत. अनेक योजनांचे पैसे या सरकारला देता येत नाही, कांद्याचे अनुदान पाच वर्ष झाले तरी मिळाले नाही, आज अवघे दहा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आमचे आघाडीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.

या सरकारने ५० हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही देऊ असे जाहीर केले व एक दमडीही यांनी दिली नाही. आजही एक रुपयामध्ये विमा मिळेल असे सांगतात, अनेक ठिकाणी ई पीक पाहणी केलीच नाही तर पैसे मिळणार कसे. त्यामुळे ७५% शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहणार असल्याचेही तनपुरे म्हणाले.

आमच्या सरकार असताना आम्ही जी थकबाकी महावितरणची वसूल केली जाईल त्यातील ३३% रक्कम ही शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. आज त्याचे दोन हजार कोटी रुपये पडून आहेत. हे सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही. मग दोन हजार कोटी रुपये कुठे गेले हे सरकारने जाहीर करावे असे आव्हान श्री. तनपुरे यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही जेवढा निधी निळवंडे धरणासाठी दिला तेवढा या सरकारने त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत दिलेला नाही. आता या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जण धडपड करत आहेत, त्यांना प्रश्न सोडवायचे नाही तर त्यांना फक्त उद्घाटन करायचे आहेत असा टोलाही त्यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली बैठक झाली. कार्यकारणीतील ९० पैकी ६० सदस्य यावेळी उपस्थित होते. जे सदस्य अनुपस्थित होते त्यांच्या जागी आम्ही नव्याने नियुक्ती करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

तसेच लवकरच नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे तर दुसरीकडे राज्यातील कार्यकर्त्यांसाठी एक शिबिर शिर्डी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित करणार असल्याचेही फाळके यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe