Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे.
हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी जाहीर करून पाण्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग फुंकले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेंगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे.
यंदा नगर – नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या दोन्ही जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडल्यास या भागातील शेती व कारखानदारी उद्धवस्त होईल.
त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येथे करण्यात येणाऱ्या उपोषणात शेतकरी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणांसह सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडल्यास फक्त ९ ते १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार असून,
त्यातून गोदावरी कालव्यांना किती आवर्तने मिळणार हे जलसंपदा खात्याने जाहीर करावे. कोपरगावसह नगर, नाशिक जिल्ह्यावर पाण्याबाबत होणारा अन्याय शासनाने त्वरित दूर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली…