समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार यंदा जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून हे पाणी जायकवाडीला सोडले. याचे पडसाद अधिवेशनात देखील पाहायला मिळाले.
खा. सदाशिव लोखंडे यांनी हिवाळी अधिवेशनात यावरून चांगलाच घणाघात केलाय. या सोबतच त्यांनी समुद्राला वाहून जाणारे पाणी नगरसह मराठवाड्यात वळवा अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले खा. लोखंडे
२००५ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायदा झाला. हा काळा कायदा आहे. नगर व नाशिक जिल्ह्यावर अन्याय करणारा हा कायदा आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने व नेत्यांनी मोठा अन्याय केलाय असा घणाघात खा.लोखंडे केला आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी काही पर्ययही सांगितले. ते म्हणाले की, पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे पाणी नगर व मराठवाड्याच्या जिरायती भागात वळवलं तर याचा फायदा होईल. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ राज्य सरकारला निर्देश दयावेत.
तसा प्रस्ताव पाठविण्यासाठी राज्याला सांगावे अशी मागणीवजा विनंती खासदार लोखंडे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आज अधिवेशनात केली. तसेच खा. लोखंडे यांनी निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले.
आजपासून राज्याचेही अधिवेशन
आजपासून नागपूर याठिकाणी राज्याचेही अधिवेशन सुरु झाले आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजेल यात शंका नाही. मराठा आरक्षण, महागाई तत्सम गोष्टींवरून हे अधिवेशन गाजेल. दरम्यान या अधिवेशन काळात थेट अधिवेशनावर १०० मोर्चे धडकणार आहेत. त्यातील ४५ मोर्चास परवानगीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.