निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावरील निम्नस्तर वितरीकेतून पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर घेण्यात आल्यामुळे निळवंडे लाभक्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याच्या सद्य परीस्थितीबाबत आढावा घेतला. लाभक्षेत्रातील वितरीकेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.

या मागणीची दखल घेऊन डाव्या कालव्यावरील वितरीकेतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
डाव्या कालव्यावरील वितरीकेतून शनिवारी रात्री पाणी सोडण्यात आल्याने निळवंडे, माळेगाव हवेली, कोकणगाव, मनोली, ओझर खुर्द, उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, औरंगबाद, सादतपूर, चिचपूर, प्रतापपूर आणि दाढ बुद्रुक, चंद्रापूर या गावांमधील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
डाव्या कालव्यावरील वितरीकेचे काम पूर्ण झाल्याने या वितरीकेतून पाणी मिळावे, अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे.
मागील वर्षापेक्षा यावर्षी पाण्याची पातळी जास्त खोलवर जाणार आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाच्या झळा फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे. मध्यंतरी झालेल्या थोड्या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी एकूणच पाऊस कमी असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह खरीपातील पीकांना तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पाण्यामुळे मिटणार आहे.
या पाण्याचा दिलासा मिळण्याच्या दृष्टीने पाणी सोडण्याबाबतच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांनी वितरीकेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले.