Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.
त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षांनी आपले उमेदवार फायनलाइज करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवले जात आहेत.

सत्ता पक्षाने पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे तर विपक्ष मधील नेत्यांनी नव्याने सत्ता काबीज व्हावी यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा गढ समजला जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादीकडे अहमदनगर जिल्ह्यात सहा आमदार होते. मात्र अजित दादांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर पवार गट राष्ट्रवादीकडे आता नगर जिल्ह्यात फक्त दोन आमदार उरले आहेत.
म्हणजेच फूट पडण्यापूर्वी नगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता शरद पवार गटाचे वर्चस्व येथे काहीसे कमी झाले आहे. हेच कारण आहे की राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखप्राप्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पुन्हा एकदा आपल्या गटाचे वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली आहे.
यासाठी शरद पवार गटाने कालपासून साईनगरी शिर्डी येथे भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. मात्र कालपासून आयोजित या शिबिराला शरद पवार गटाचे ताकतवर नेते रोहित पवार गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार आणि शरद पवार यांच्यात देखील काहीतरी धुसफूस सुरू आहे की काय ? अशा चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान यावर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुजय यांनी यानिमित्ताने शरद पवार गटाची फिरकी घेतली आहे. खासदारांनी आमदार रोहित पवार नेमके कुठे नॉट रिचेबल झाले आहेत हे शोधावं लागेल असा खोचक टोला लगावला आहे.
तसेच हे शिबिर शिर्डीत ठेवल्याने केवळ देवदर्शनासाठी म्हणून या शिबिराला गर्दी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर शरद पवार गटाचे हे शिबिर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ठेवलं असतं तर राष्ट्रवादीची ताकद समजली असती असाही टोला सुजय विखेंनी लगावला आहे.