Ahmednagar News : मंगळवार व बुधवार सलग दोन पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात संततधार पाऊस पडल्याने जनजीवन ठप्प झाले. तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला असून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जानेवारी महिन्यात गहू, ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात. तर काही कांदा पिके काढणीला असतात. अशात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणा नंतर मंगळवारी व बुधवारी सकाळी सुपा परिसरासह पारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसास सुरुवात झाली.
तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात धुके होते. शेतातील जे पिके पाण्यावर आहेत त्यांना हा पाऊस फलदायी असला तरी काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस त्रासदायक आहे. मंगळवारी सकाळी पावसास सुरुवात झाल्याने शेतीकामे ठप्प झाली.
दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने सुपा येथील आठवडे बाजारात खरेदी व विक्री करणाऱ्यांची एकच धांदल उडाली.
जानेवारीत आलेला हा अवकाळी पाऊस काही शेतमालाला फलदायी असला तरी काही पिकांना मात्र मारक आहे. पावसानंतर ऊन पडले नाही किंवा हे असेच सुर्यदर्शन न होता झाकलेले वातावरण राहिले तर मात्र भाजीपाला पिके,
फुल शेती व नगदी पिकांचे मोठे नुकसान होईल. ज्वारी, गहू हरबरा आदी पिके बी भारणीत आल्याने ही पिके पडण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कांदा सलग दोन दिवस शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.