उत्तर प्रदेशसरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकारने का करू नये : आमदार तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल.

नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे आणि त्यांनाही या आनंदात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घ्यावा, असे आ. तांबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उभारणीचं काम जोमाने सुरू असून, २२ जानेवारी रोजी या मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानिमित्ताने राज्यातही तयारी सुरू झाली असून २२ जानेवारी रोजी राज्यातील सर्वच शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिरवणुका, आतषबाजी आणि उत्सवाचं वातावरण असेल.

राज्यात असलेल्या या उत्सवी वातावरणामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना हा दिवस उत्साहात साजरा करता यावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने याआधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात अशी सुट्टी जाहीर झाली, तर सर्वच लोकांना या उत्सवात सहभागी होणं शक्य होईल.