Ahmednagar News : नगर शहराचे अहिल्यानगर, असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, महायुती सरकारने आश्वासनांची वचनपुर्ती केल्याची प्रतिक्रीया महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. नगर जिल्हा ही अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे.

त्यामुळे नगर शहराला त्यांचे नाव देवून उचित सन्मान झाला असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखविली. चौंडी गावात अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या
कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्याची वचनपुर्ती महायुती सरकारने केली असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
या निमित्ताने अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव तसेच त्यांचे विचार आणि कार्याची स्मृती पुढे घेवून जाणारा व सर्व समाज घटकांना प्रेरणा देणारा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नामकरणाच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.