Ahmednagar News : पावसात पडलेल्या विद्युत पोलच्या तारांमध्ये चालू असलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका शेतकऱ्यांसह दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील वाळके वस्ती परिसरात गुरुवारी (दि.१३) संध्याकाळच्या सुमारास घडली.
या घटनेने बेलवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेत जागीच गतप्राण झालेल्या शेतकऱ्याचे नाव संभाजी किसन वाळके आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्ती वरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे गुरुवारी (दि. १३) सकाळी शेळ्या घेऊन नदीच्या कडेला चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल बुधवारी (दि. १२) रात्रीच्या पावसात पडले होते. विजेचे पोल पडून सुमारे १८ तास उलटले
तरी देखील त्यातील विद्युत प्रवाह चालू होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरत असताना त्या तारेजवळ गेल्या आणि त्यांना करंट लागला. यावेळी शेळ्या घेऊन गेलेले संभाजी वाळके यांनी शेळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शेतातील साचलेल्या पाण्यात पडलेल्या विजेच्या तारामुळे करंट लागला. विजेच्या तीव्र धक्क्याने संभाजी वाळके हे जागीच मयत झाले.
ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफार्मारचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके जागीच गतप्राण झाले होते. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कैलास शिपणकर,
नंदकुमार पठारे यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करत रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून महावितरण कंपनीने त्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.