Ahmednagar News : सातत्याने शेतीला नवे ठवणाऱ्या, येणाऱ्या संकटांनी हतबल होणाऱ्या नवयुवकांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर या शेतकऱ्याने नादखुळा प्रयोग केला आहे. खडकाळ माळरान फोडून तेथे सोने पिकवले आहे.
हे शेतकरी संगमनेर व अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील पिंपळदरी येथील असून संतोष सुदाम काकड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. माळरानावर अकरा एकर शेत तयारी करून येथे टोमॅटोची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने पीक घेऊन केवळ तेरा तोड्यांतच ऐंशी लाख रुपयांचे मिळविले आहे. काकड यांनी मार्च महिन्यात मेहनतीला सुरवात केली.

त्यांनी अकरा एकरांवर मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. तेथूनच सुरुवात झाली घाम गाळायला. पाणी उपलब्ध होते तोपर्यंत सुरुवातीला पाणी दिले पण उन्हाचा तडाखा वाढताच पाणी कमी झाले. काकड यांनी या संकटाला न घाबरता शेजारील शेतकरी मित्रांकडून पाणी घेत टोमॅटोचे रोपे जगवली. त्यांचे कष्ट फळाला आले आणि ३० मे रोजी टोमॅटो फळकाढणीला सुरुवात झाली.
त्यावेळी पाचशे रुपये क्रेटसचा बाजारभाव मिळाला, तर सद्यस्थितीला अकराशे रुपये क्रेटला भाव मिळत आहे. दररोज चौदाशे क्रेट निघत असून, थेट राज्याची सीमा ओलांडून टोमॅटो केरळला जात आहेत. आतापर्यंत तेरा तोडे झाले असून, ऐंशी लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना तेवीस लाख रुपयांचा खर्च करावा लागला.
अजूनही त्यांचे पीक जोमदार आहे. जर बाजारभाव टिकून राहिले, तर पुन्हा आणखी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मोठा आदर्श
नोकरीच्या मागे धावणाऱ्या व शेतीत हतबल होणाऱ्या तरुणांसाठी हा मोठा आदर्श आहे. सुक्ष्म नियोजन, सातत्य, बाजारभावाचा अंदाज यावर लक्ष देत काम केल्याने निश्चितच फळ मिळते तसेच यशापर्यंत जाण्याचा रस्ता सापडत असतो.