Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील तरुणाशी यवतमाळ येथील तरुणीचे ३ दिवसापूर्वी लग्न होऊन नवरी आणि तिच्या आईने श्रीगोंदा कोर्टात लग्न रजिस्टर करण्याच्या नावाखाली श्रीगोंदा कोर्टात आलेल्या नवरदेवाच्या आई वडिलांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून २ लाख ३० हजार रुपये घेऊन फरार झल्याची घटना घडली.
परंतु ते फरार होत असताना न्यायालयातील वकिलांनी तत्परता दाखवत नवरी, तिची आई आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना गाडीसह पकडून श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव येथील तरुणाचे यवतमाळ जिल्ह्यातील तरुणीशी मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न जमविले. हे लग्न जमविताना मध्यस्थी असणाऱ्या इसमाने तरुणाच्या नातेवाईकांकडून २ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न जमवत
बुधवारी (दि. २६) कोळगाव येथील साकेवाडी परिसरात असलेल्या दत्त मंदिरात विवाह लावून दिला. सदर लग्नाची नोंद श्रीगोंदा न्यायालयात रजिस्टर करण्यासाठी शुक्रवारी (दि.२८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नवरा मुलगा, नवरी मुलगी, तिची आई, नवरदेवाची आई, वडील हे सर्व मिळून श्रीगोंदा येथील न्यायालयात लग्नाची नोटरी करण्यासाठी अॅड. अक्षय जठार यांच्याकडे आले होते.
नवरा मुलगा वकिलांशी बोलत असताना नवरी, तिची आई यांनी पळून जाण्यासाठी अचानक नवरीची आईने सोबत आणलेल्या पिशवीतून मिरची पावडर काढून मुलाच्या आईच्या डोळ्यात फेकुन सोबत आलेल्या दोन जणांनी आणलेल्या गाडीतून पळून जात असतानाच फेकलेली मिरची पावडर
उपस्थित असलेल्या काही नागरिकाच्या डोळ्यात गेल्याने परिसरात एकच गोंधळ तसेच आरडाओरडा सुरू झाल्याने प्रसंगावधान राखून तेथे उपस्थित असलेल्या अॅड. अक्षय जठार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ गाडी थांबवत गाडीतील नवरी, नवरीची आई आणि इतर दोन सहकाऱ्यांना गाडीसह पकडून श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.