Ahmednagar News : लोकसभा निवडणूकीत ज्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना स्वतःच्या गावात मताधिक्य देता आले नाही, त्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा पायगुण असा आहे की, त्यांच्या विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणूकीत पराभव पत्करावा लागला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना त्यांच्या वाळकी गावातूनच विखे यांना मताधिक्य देता आले नाही. भालसिंग साहेब आगोदर तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवा, ग्रामपंचायत सदस्य व्हा. व मगच अशी मुक्तफळे उधळा. अशी टीका त्यांच्याच गावातील लंके समर्थकांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुहासराव कासार, पंचायत समितीचे मा. सदस्य संभाजीराव कासार, उपसरपंच दादासाहेब कासार, सामाजिक कार्यकर्ते गुंडा भाऊ जासूद, अरूण कासार, ग्रामपंचायत सदस्य विकास कासार, सागर कासार, संदीप बोठे यांनी भालसिंग यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांना चांगलेच सुनावले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना.विखे पाटील यांनी दूधाच्या प्रश्नाबबात घेतलेली भेट खा.निलेश लंके यांना समजायला वेळ लागेल, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या माध्यमातून अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायाला पाठबळ त्यामुळेच मंत्री विखे पाटील यांनी शहा यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण आहे.
मात्र या भेटीवर खा. निलेश लंके यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आणि किव करणारे असल्याचे सांगत दूधाच्या प्रश्नावरून संसद बंद पाडू म्हणणारे अधिवेशनात एक शब्दही काढू शकले नाही. यासाठी प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो.अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी खासदार नीलेश लंके यांच्यावर केली होती.
परंतु भालसिंग यांना आता त्यांच्याच गावातील लंके समर्थकांनी चांगलेच सुनावले आहे. याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, खासदारांवर बोलण्याची आपली लायकी नाही.
आपली क्षमता काय ? आपण बोलता काय ? निवडणूकीच्या काळातही तुम्ही अनेकदा टीका केली आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. याचा अर्थ आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत हे लक्षात ठेवा. अमूलच्या माध्यमातून जसा तुम्ही गुजरातचा उदो उदो करत आहात त्याच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दुधाला भाव का नाही याचेही उत्तर देण्याची जबाबदारी पार पाडा.
शेतकऱ्यांच्या दुधाला, कांद्याला भाव मिळत नसेल तर त्याविरोधात आवाज उठविणे हे लोकपतिनिधीचे कर्तव्य असते. मात्र तुम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुखः दुःखात सहभागीच झाला नाहीत तेंव्हा तुम्हाला वेदना कशा कळणार ? खासदार लंके यांनी आंदोलन करून सरकारच्या नाकी नउ आणल्यामुळे पायाखालची वाळू सरकलेले भालसिंग बरळू लागले आहेत.