४ फेब्रुवारी २०२५ सातारा : महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे.आणखी २९४ गावांचा समावेश या प्रकल्पात केला जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ कडून या नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे स्थळ आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरमध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी होते.आता महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटनस्थळाची रचना करण्यात येणार आहे.याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या तीन वर्षात आराखडा पूर्ण केला जाणार आहे.
महाबळेश्वर,पाचगणी भागात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.याचाच विचार करून राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्प करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली होती. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील २३५ गावांचा यात समावेश करण्यात आला होता.आता आणखीन नव्याने २९४ गावांचा या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात आपला समावेश करावा असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.
आता या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात ५२९ गावांचा समावेश असणार आहे आणि २०९७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे गिरीस्थान उभारले जाणार आहे.या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नव्या अधिसूचनेनुसार कोयना बॅकवॉटर आणि परिसरातील गावांचा विकास करून नवीन महाबळेश्वर वसवले जाणार आहे.
यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. या भागातील अधिकाऱ्यांचा बैठकादेखील त्यांनी घेतल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे नवीन पर्यटनस्थळ वसवण्यात येणार आहे.या गावांमध्ये रोप वे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्रॅक, फ्युनिक्युलर रेल्वे यासह टुरिजम पॅराडाईजसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत.त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.
महाबळेश्वरच्या शेजारीच असलेल्या कोयना बॅकवॉटर भागात हे नवीन गिरीस्थान वसवण्यात येणार आहेत.नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यातील १०१ गाणे, पाटण तालुक्यातील १९३ गावे आणि ४९ गावे जावळी तालुक्यातील आहेत.
या गावांचे एकूण क्षेत्र एक लाख १५ हजार ३०० हेक्टर इतके आहे. हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी कांदाटी या उपनद्या वाहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे.परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने तो परिपूर्ण आहे.
पर्यावरणाला जपून पर्यटन विकास
नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल. याबाबत या भागातील लोकांसोबत त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. प्रस्तावित प्रकल्पात पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता निसर्गपूरक शाश्वत पर्यटन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.