अपर तहसील कार्यालयाला जोडण्यास समनापूरचा विरोध

Mahesh Waghmare
Published:

समनापूर : आश्वी येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास जोडण्यास संगमनेर तालुक्यातील समनापूर गावाने विरोध केला असून तसा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे नुकतीच ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत आश्वी बुद्रूक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समनापूर गाव आश्वीपासून अंदाजे २० ते २२ किलोमीटर आहे.

त्यामुळे गाव आश्वी बुद्रूक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयास जोडल्यास नागरिकांची भविष्यात गैरसोय होणार आहे. त्यामुळे अपर तहसील कार्यालयास जोडण्यास समनापूर येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. तरी प्रस्तावित अपर तहसील कार्यालयास समनापूर गाव जोडण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केला आहे.

या ठरावाची सूचना भास्कर ज्ञानदेव शेरमाळे यांनी मांडली, तीस अनुमोदन दत्तात्रय श्रावण चांडे यांनी दिले. यावेळी गणेश शेरमाळे, किशोर नेहे, देवा शेरमाळे, सोमनाथ शेरमाळे, संतोष नेहे, हुसेन इनामदार, शिवाजी शेरमाळे, मानकु शेरमाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe