१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News: बारावीचे वर्ष जीवनाला कलाटणी देणारे वर्ष समजले जाते . त्यामुळे या वर्षाला अत्यंत महत्व दिले जाते .सध्या बारावीची परीक्षा सुरू झालेली असून पहिल्याच पेपरला तब्बल ९८३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे.
यंदाच्या वर्षी अहिल्यानगर जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र आहेत. त्या केंद्रांपैकी ४० केंद्रांना संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात आले. तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आजचा पहिला पेपर कॉपीमुक्त गेला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने दिली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-88.jpg)
राज्य परीक्षा मंडळाकडून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी) मंगळवार (दि.११) पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात ६२ हजार ४९९ परीक्षार्थीनी परीक्षा दिली आहे. तर ९८३ विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेरपरला दांडी मारली. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात कॉपी सारखे गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करणे, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द करणे आदी कारवाई करणार आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येकी दोन बैठे पथकांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे. यंदा अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून या सर्व प्रक्रियेवर सीईओ येरेकर यांचे लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत यंदा गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.