२० फेब्रुवारी २०२५ मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत,त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आजच्या या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाइन सोडत काढण्यात आली.यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीत सहभागी झालेले नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदवण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिडकोची ही घरे टाटा एल एण्ड टी, शापूरची यांच्या सहभागाने बांधल्याने ती अतिशय दर्जेदार असून ही घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागायचे,असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की,आता अटल सेतूमुळे २० मिनिटांत प्रवास होतो.आता
ठाणे ते विमानतळ एक डेडिकेटेड कॉरिडॉर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे.
यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहीर केले असल्याने महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.समूह विकासाच्या माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले
एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या वाढली
एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते.मात्र, त्यावेळी रिमूव्हर्स सर्क्युलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली.यावरून हे शासन प्रो एन्व्हॉयर्नमेंट प्रकल्प करत आहे, हे दिसून आले.